अखेर मनोज जरांगेंचं ठरलं, थेट मुंबईच गाठणार, उद्या सर्वात मोठी घोषणा; अंतरवलीत मोठ्या घडामोडी
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईला कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ते मुंबईला जाण्याची तारीख जाहीर करणार आहेत. 14 दिवसांच्या उपोषणानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधवही मुंबईकडे येणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या घोषणेकडे लागले आहे.

अखेर मनोज जरांगे पाटील यांचं ठरलं आहे. अंतरवली सराटीत 14 दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईला धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे पाटील उद्या याबाबतची मोठी घोषणा करणार आहेत. मुंबईला जाण्याची तारीखच मनोज जरांगे पाटील उद्या सांगणार आहेत. तसेच मुंबईला जाण्यासाठी जरांगे यांची संपूर्ण तयारी झाली असल्याने जरांगे यांच्या उद्याच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचं निश्चित केल्याने अंतरवलीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. जालना ते मुंबईला जाण्यासाठी मीडिया व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅनमधूनच जरांगे मुंबईला येणार असून त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधवही मुंबईला येणार आहेत. सकल मराठा समाजाने ही व्हॅन तयार ठेवली आहे. मुंबईला जाण्यासाठी असंख्य वाहने तयार ठेवण्यात आली आहेत. फक्त जरांगे यांनी तारीख जाहीर करताच सर्व जण मुंबईच्या दिशेने यायला निघणार आहेत. येत्या सोमवारपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे जरांगे मुंबईला येण्याची कोणती तारीख जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आधी बैठक, मग निर्णय
मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवली सराटीत जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू असून आज आमरण उपोषणाचा 14 वा दिवस आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला धडक देऊ, असा निर्धार जरांगे पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर उद्या त्यांनी अंतरवली सराटीत मराठा समाजाची बैठक देखील बोलावली आहे. या बैठकीनंतर जरांगे पाटील आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
रात्री उशिरा लावली सलाईन
दरम्यान, उपोषणामुळे जरांगेंची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर रात्री उशिरा उपचार करण्यात आले. जरांगे यांना रात्री उशिरा सलाईन लावण्यात आली. रात्रीच वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या बीपी आणि शुगरची तपासणी करण्यात आली आहे.
मध्यरात्री रास्ता रोको
दुसरीकडे धाराशिवमध्ये काल रात्री 12 वाजता मराठा आंदोलकांनी रास्ता रोको करून सरकारचा निषेध नोंदवला. लातूर-पुणे महामार्गावर तेरणा नदी पुलावर लाकडे पेटवून आंदोलकांनी आंदोलन केलं. त्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. या अनपेक्षित रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
