मोदी सरकारबाबत संजय राऊत यांचं मोठं भाकीत; केंद्रात आणि राज्यात काय घडणार? थेटच सांगितलं…
संजय राऊत यांनी मोदी सरकारबद्दल मोठे भाकीत केले आहे. 2029 पूर्वी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह पदावरून जातील, असा त्यांचा दावा आहे. यामुळे केंद्रात आणि राज्यात मोठे राजकीय फेरबदल होतील, असे ते म्हणाले. राऊतांनी यावेळी एसआयटी आणि ईडीच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार विषयी मोठं भाकीत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पदावरून लवकर जाणार आहेत. अमित शाहही पदावर नसतील. हे सरकार 2029 पर्यंत राहणार नाही, असं भाकीतच संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी यापूर्वीही मोदी सरकार लवकरच जाणार असल्याचं अनेकदा सांगितलं आहे. राऊत वारंवार मोदी सरकारविषयी भाकीत करत असल्याने दिल्लीत खरोखरच राजकीय उलथापालथ होणार आहे का? याविषयीची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
खासदार संजय राऊत हे नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडमधील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज नांदेडमध्ये उबाठाने मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी राऊत नांदेडला आले आहेत. मोर्चा सुरु होण्यापूर्वी राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती पासून ते विविध राजकीय प्रश्नांवर उत्तरे दिली. ही उत्तरे देत असतानाच त्यांनी केंद्रातील मोदी सरकार विषयी मोठं भाकीत करून खळबळ उडवून दिली आहे.
काय म्हणाले राऊत?
2029च्या आधी सरकार राहत नाही. सरकार जात आहे. 2029च्या आधीच मोदी पंतप्रधान पदावरून गेलेले असतील. अमित शाहही नसतील. राज्यात आणि देशात मोठे फेरबदल होतील. अनेक ठिकाणी पडझड होईल. मोदी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. मी भाकीत करत नाही. सत्य स्थिती सांगतोय, असं राऊत म्हणाले.
महाराष्ट्राला एसआयटीचं अजीर्ण
एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. त्यावरही राऊत यांनी टीका केली. फडणवीस यांच्या काळात अशा 57 एसआयट्या स्थापन झाल्या. ही 58 वी असेल. काय झालं या एसआयट्यांनी? काहीही झालं तर एसआयटी स्थापन करतात. महाराष्ट्राला या एसआयट्यांचं अजीर्ण झालं आहे. एमपीएससीने हजारो मुलं बाधित झाले आहेत. मुलं रस्त्यावर आली आहेत. हैराण झाली आहेत. एसआयटी स्थापन करून काय करणार आहात? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला.
आता ईडी भाजपची यंत्रणा
ईडीमध्ये भरती सुरू झाली आहे. त्यावरूनही त्यांनी टीका केली. ईडी भरतीची प्रक्रिया भाजप कार्यालयात होत असेल. एकेकाळी ईडी ही केंद्रीय तपास यंत्रणा होती. आता भाजपची यंत्रणा झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.
