Dhananjay Munde : 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असूनही परळीला निधी नाही, इथले लोकप्रतिनिधी करतात काय? धनंजय मुंडेचा प्रीतम मुंडेंना सवाल
छत्तीसगडमधील वैद्यनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाही, तरी त्याला केंद्र सरकार 1600 कोटी निधी देते. मात्र आपले परळी ज्योतिर्लिंगांमध्ये येत असूनही निधी नाही, याबद्दल धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
परळी, बीड : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असूनही आपल्या परळीला केंद्र सरकारमधून (Central Government) एक रुपयाही येऊ शकत नाही, हे इथल्या लोकप्रतिनिधीचे अपयश आहे, असा निशाणा आमदार धनंजय मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्यावर साधला आहे. ते परळीत बोलत होते. परळी शहरातील विद्यानगर भागात महात्मा बसवेश्वर उद्यानाच्या उभे करण्यात आले आहे. याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मुंडे बहीण-भावांमध्ये नेहमीच एकमेकावर राजकीय टीकाटिप्पण्या सुरूच असतात. यातच आता माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारच्या निधी मंजूर करून आणण्यात बीडच्या खासदार कशा अपयशी ठरतात, यावरून टोला लगावला आहे. नाव न घेता त्यांनी खा. प्रीतम मुंडे यांच्यावर हा हल्लाबोल केला.
‘इथल्या लोकप्रतिनिधींना अपयश’
धनंजय मुंडे यांनी सांगितले, की बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या आपल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगासाठी आपण मंत्री असताना राज्य शासनाकडून 133 कोटी रुपये तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर करून आणले. मात्र बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असूनही केंद्र शासनाचा निधी मात्र मिळवून घेण्यात इथल्या लोकप्रतिनिधींना अपयश आले. एका बाजूला दुसऱ्या राज्यातील वैद्यनाथ धामसाठी केंद्र सरकार 1600 कोटी रुपये निधी देते आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असूनही आपल्या परळीला मात्र केंद्र सरकार मधून एक रुपया येऊ शकत नाही हे इथल्या लोकप्रतिनिधीचे अपयश असल्याचा निशाणा त्यांनी लगावला.
‘त्यांनी आतापर्यंत काय केले?’
छत्तीसगडमधील वैद्यनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाही, तरी त्याला केंद्र सरकार 1600 कोटी निधी देते. मात्र आपले परळी ज्योतिर्लिंगांमध्ये येत असूनही निधी नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. विकास करणे, 100, 200 कोटी रुपये निधी आणणे काही मोठी गोष्ट नाही. केंद्र सरकारमध्ये कोणीही असले तरी आपण आपले संबंध, ताकद, प्रतिष्ठा मिळवली, असे ते म्हणाले. मात्र जे लोक सभागृहात या भागाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांनी आतापर्यंत काय केले, असा सवाल त्यांनी केला आहे. तर विकासाची जबाबदारी आता आपण घेतली आहे, असे मुंडे म्हणाले.