तुमचा एक भाऊ मरेल, आधी भीती घातली अन् मग…; अशोक खरातच्या भोंदूगिरीत पत्नीचीही साथ, कसा रचला डाव?
नाशिकच्या भोंदू अशोक खरातने मृत्यूची भीती दाखवून मिरगाव येथील माळी कुटुंबाची १६ एकर जमीन कशी हडपली, याचा सविस्तर वृत्तांत. खरातवर आतापर्यंत १४ गुन्हे दाखल झाले असून पोलीस तपास सुरू आहे.

अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्याच आता अंधश्रद्धेचा आधार घेऊन सुरू असलेला अशोक खरातच्या भोंदूगिरीचा बाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अध्यात्माच्या नावाखाली लोकांच्या अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेणाऱ्या अशोक खरातच्या पापाचा घडा आता भरत चालला आहे. अशोक खरात विरुद्ध १४ वा गुन्हा दाखल झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं काय घडलं?
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात आणि कल्पना खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात आणि कल्पना खरात यांनी मिरगाव येथील माळी कुटुंबातील चार भावांवर आपल्या तथाकथित आध्यात्मिक शक्तीचा पगडा निर्माण केला होता. तुमच्या घरावर मोठे संकट आहे, असे सांगून त्याने या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आपला खरा डाव टाकला. त्याने या भावांना सांगितले की, त्यांच्या मालकीची १६ एकर जमीन ही त्यांच्यासाठी अपशकुनी आहे. जर त्यांनी ही जमीन विकली नाही, तर कुटुंबातील चार भावांपैकी एकाचा मृत्यू होईल, अशी भीती घातली.
यानंतर मृत्यूच्या भीतीपोटी हवालदिल झालेल्या माळी बंधूंनी आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी ती जमीन विकण्याचा निर्णय घेतला. याचाच फायदा घेत खरातने कोट्यवधी रुपये बाजारमूल्य असलेली ही सुपीक जमीन अत्यंत नाममात्र दरात स्वतःच्या नावावर करून घेतली. आपली पिढ्यानपिढ्यांची जमीन गेल्यानंतर हे कुटुंब उघड्यावर आले. तर दुसरीकडे खरातने त्याच जमिनीवर आपले साम्राज्य उभे केले.
हडपलेल्या जमिनीवर ईशानेश्वर मंदिर उभारले
अशोक खरातने या हडपलेल्या जमिनीवर ईशानेश्वर मंदिर उभारले, जेणेकरून तो पुन्हा भाविकांना आकर्षित करून आपली भोंदूगिरी सुरू ठेवू शकेल. त्याच परिसरात त्याने स्वतःसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असे भव्य फार्म हाऊस बांधले. यानंतर माळी बंधूंना जेव्हा आपली फसवणूक झाल्याचे आणि खरातने केवळ भीती दाखवून जमीन लाटल्याचे उमजले, तेव्हा त्यांनी सिन्नर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
अशोक खरातवर यापूर्वीच जादूटोणा प्रतिबंधक कायदा, फसवणूक (कलम ४२०), विनयभंग आणि धमकावणे अशा विविध कलमान्वये नाशिकमधील अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. सिन्नर पोलीस आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची आणि महसूल कागदपत्रांची चौकशी करत आहेत. या भोंदू बाबाने अशाच प्रकारे धर्माचा आधार घेऊन इतर किती शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
