NCP Merger: मोठी बातमी! राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं घोडं दामटणार? बारामती पोटनिवडणुकीदरम्यानची मोठी अपडेट काय?
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरण कधी होणार असा सवाल दोन्ही पक्षातील नेत्यांना पडला असतानाच आता मोठी अपडेट समोर आली आहे. आज बारामती पोटनिवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याचवेळी ही चर्चा समोर आली आहे.

NCP Merger: शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची तारीखही ठरली होती आणि ठिकाणही ठरले होते असा दावा शरद पवार गटाकडून वारंवार करण्यात आला. अजितदादांचा 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला आणि एकत्रिकरणाच्या चर्चेला खीळ बसली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी विलीनकरणासाठी आग्रही भूमिकाही घेतली आणि ती हिरारीने मांडली. पण त्यातून हाती काही लागले नाही. या केवळ बोलघेवड्या चर्चा ठरल्या. त्यानंतर भाजपला विचारल्याशिवाय विलीनीकरण होणार नाही या खास गुगलीने अनेकजण त्रिफळाचीत झाले. तर आता बारामती पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पुन्हा या चर्चांनी डोके वर काढले. काय आहे मोठी अपडेट?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलनीकरण च्या मुद्द्याला पूर्णविराम देण्यात आला आहे. गेल्या ३ दिवसांपासून मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बैठक सुरू आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून विलनीकरण हे कायमच बंद झालं आहे आणि पक्ष संघटना वाढविण्याची संदर्भात पदाधिकाऱ्यांनी काम करावं अश्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. आज देखील बलार्ड पीअर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बैठक होत आहे. आज मुंबई विभागाची आढावा बैठक ही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होईल.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाची चर्चा कायमची बंद झाल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितलं. तसेच त्यांनी आता शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष वाढीसाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील विलीनीकरणाचे गाडे पुढे जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला काही नेते खोडा घालत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. या नेत्यांमुळे विलीनीकरण न झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पण विलीनीकरण झाले तरी हा पक्ष महाविकास आघाडीत राहणार की महायुतीसोबत जाणार याविषयीचे निश्चित धोरण समोर येत नसल्यानेही एकत्रिकरणाच्या चर्चा वांझोट्या ठरल्या आहेत. त्यामुळे आता दोन्ही पक्ष त्यांच्या ध्येय धोरणानुसार पुढे जाणार असल्याचे समोर येत आहे. त्यातच ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीच्या चर्चा घडवून आणून एकप्रकारे दबाव तयार करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
