दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत सर्वात मोठी अपडेट, शरद पवारांच्या पक्षाची माघार? शशिकांत शिंदेंनी नेमकं काय म्हटलं?
NCP Merger : गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसेच त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणावर अजित पवारांसोबत सकारात्मक बोलणं झालं होतं आणि दोन्ही पक्ष एकत्र येणार होते असा दावा केला जात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र या चर्चा फेटाळण्यात आल्या आहेत. अशातच आता शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आम्ही हा विषय…
शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकाराशी बोलताना म्हटले की, ‘दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबाबत बोलत आहेत. मात्र आता आम्ही हा विषय बंद केला आहे. आम्हीच विलीनीकरणाच्या मागे लागलो आहे असं चित्र निर्माण केलं जात आहे. आमच्याकडून यासाठी गडबड करण्यात आलेली नाही. दादांच्या निधनानंतर त्यांचीच चर्चा सुरू झाली. त्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो, शपथपूर्वक बोललो. त्यानंतर आम्ही कधीच बोललेला नाही. आम्ही एवढंच म्हणालो की दादांची ही इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. मात्र आता यावर बोलायचं नाही हे आम्ही ठरवलं आहे.’
विलीनीकरणाला कुणाला विरोध?
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा या विलीनीकरणाला विरोध दिसून येतोय का? याबाबतच्या प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘या बाबतीत मी काही बोलणार नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. आता आम्ही पुन्हा जोमाने काम करून पक्ष उभा करण्याची भूमिका घेत आहोत. त्यामुळे याबाबत त्यांची काय भूमिका आहे हे मी सांगणं योग्य ठरणार नाही.’
तो आता सुनेत्रा वहिनींचा अधिकार…
विलीनीकरणानंतर तुम्ही एनडीएसोबत जाणार होतात की अजित पवार एनडीएतून बाहेर पडणार होते? या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘याबाबत काय निर्णय घ्यायचा हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार होतं. त्यांच्या मनात काय होतं, माझ्या मनात काय होतं हे आता गेल्यानंतर सांगणं योग्य नाही. याबाबत एनडीएसोबत त्यांनी चर्चा करावी. इथून पुढेही एनडीएसोबत जायचं की नाही हा त्यांचा निर्णय असणार आहे. सुनेत्रा वहिनींचा तो अधिकार असणार आहे.’
