Bird Flu : चंद्रपूरमध्ये बर्ड फ्लूची एंट्री, 10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन, यंत्रणांची उडाली धावपळ
Chandrapur Brid Flu H5N1 : लातूर, ठाण्यानंतर आता चंद्रपूरमध्ये सुद्धा बर्ड फ्लूची एंट्री झाली आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पोल्ट्री फॉर्म अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. संक्रमण झालेल्या कोंबड्यांना मारण्यात येणार आहे.

राज्यातील लातूर, ठाणे या भागात बर्ड फ्लूने डोकेदुखी वाढवली असतानाच आता चंद्रपूरमध्ये या रोगाची एंट्री झाली आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. पोल्ट्री फार्म मालकांनी तात्काळ उपाय योजना सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मंगली गाव आणि आजूबाजूच्या 10 किलोमीटर परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने बैठक घेत उपाय योजना सुरू केल्या आहेत.
गेल्या महिन्यात बर्ड फ्लूची एंट्री
वृत्तसंस्थेनुसार, 25 जानेवारी रोजी ब्रह्मपूरी तालु्क्यातील मंगळी गावतील पोल्ट्री फॉर्मवर काही कोंबड्या दगावल्या. ही बाब प्रशासनाला समजातच पशूपालन विभागाने धाव घेतली. त्यांनी नमुने घेतले. नमुने पुणे आणि भोपाळ येथे पाठवण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार या कोंबड्यांना एव्हियन इन्फ्लूएंझा एच5एन1 झाल्याचे समोर आले आहे. अहवालानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी मांगली गाव आणि त्याच्या आजूबाजूचा 10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन जाहीर केला आहे. संक्रमण पसरू नये यासाठी उपाय योजना करण्यात येत आहे.




संसर्गित कोंबड्या मारणार
मांगली, गेवलाचक आणि जुनोनाटोली या गावातील पोल्ट्री फार्मवर बर्ड रॅपिड रिस्पान्स टीम पोहचली आहे. संसर्ग झालेल्या कोंबड्यांना आता नष्ट करण्यात येणार आहे. त्यांना योग्यरितीने नष्ट करण्यात येईल. तर अंडे आणि पिल्लांना पण नष्ट करण्यात येणार आहे.
संसर्ग रोखण्यासाठी या भागात दळणवळण थांबवण्यात आले आहे. या परिसरात चिकन विक्री, अंडे विक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. इतर पक्ष्यांना, पशूंना कोणताही धोका होऊ नये यासाठी कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. या परिसरात सोडियम हायपोल्कोराईट वा पोटेशियम परमॅगनेटने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या परिसरातील सर्व चिकन, मटन दुकाने सध्या बंद करण्यात आली आहे.
पोल्ट्री फॉर्म मालकांची डोकेदुखी वाढली
आता राज्यातील लातूरसह ठाणे, चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यात पोल्ट्री फार्म चालक आणि मालकांची चिंता वाढली आहे. तर अनेक हॉटेल्सवर आतापासूनच चिकन नको, अशी भूमिका ग्राहकांनी घेतली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पोल्ट्री उद्योग आव्हानांना सामोरं जात आहे.