तळ कोकणात महायुतीत मोठी ठिणगी? भाजपच्या बड्या नेत्याची मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका
मंत्री दीपक केसरकर यांच्या अडचणी वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. कारण भाजपच्या एका बड्या नेत्याने त्यांच्या मतदारसंघावर थेट दावा केला आहे. विशेष म्हणजे या नेत्याने दीपक केसरकर यांच्या कामकाजावर उघडपणे टीका केली आहे. त्यामुळे तळकोकणात महायुतीत मोठी ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

तळ कोकणात महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र आहे. भाजप नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार राजन तेली यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कारभारावर टीका केली आहे. विशेष म्हणजे राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यावर फक्त टीकाच केलेली नाही तर त्यांनी सावंतवाडी मतदारसंघावरही दावा केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात भाजप विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यात राजकीय संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. सावंतवाडी हा मतदारसंघ भाजपला का हवा? याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी राजन तेली यांनी पत्रक काढलं आहे.
“गेल्या 15 वर्षात इथले आमदार विकास का करू शकले नाहीत? आरोग्य व्यवस्था खिळखिळी का झाली? याचा विचार करण्याची गरज असल्याची टीका राजन तेली यांनी केली. सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांच्या कारभारावर भाजपच्या राजन तेली यांनी टीका केली. युतीची अगतिकता की आमची अनाग्रही भूमिका? आता विचार करायला हवा”, असं राजन तेली पत्रकात म्हणाले आहेत.
राजन तेली काय-काय म्हणाले? वाचा सविस्तर
“मित्रांनो, आज मनातल्या काही गोष्टी आपणा सर्वांशी बोलायच्या आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद आधीपासून होती. मात्र मित्रपक्षाचा आदर आणि सन्मान म्हणून आपण तडजोड करीत होतो. जेव्हा आपण हक्काने ही जागा मागून घेतली, तेव्हा आपण विजयी झालो. विकासाचे महाद्वार आज आपल्या मतदारसंघासाठी खुले झाले आहे. प्रश्न असा आहे की विकासाची पाउलवाट आमच्या सावंतवाडी मतदारसंघासाठी कधी खुली होणार आहे ? मित्रपक्षांशी तडजोड करण्यासाठी किती वर्ष या मतदारसंघाचा बळी दिला जाणार आहे? चौकुळपासून कोरजाईपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघाला आणखी किती वर्ष विकासापासून वंचित ठेवलं जाणार आहे, याचा विचार करण्याची वेळ प्रत्येक भाजप कार्यकर्त्यावर आली आहे.”
“मित्रांनो, जरा डोळे उघडून परिस्थिती पहा, कसाबसा पदवीधर झालेला मतदारसंघातला तरुण रोजगारासाठी गोव्याकडे आणि मुंबईकडे धाव घेतोय. रात्री अपरात्री दुचाकीवरून गोव्यातून घरी येतोय. महामार्गावरच्या धोकादायक प्रवासात माझे किती तरुण देवाघरी गेले, याचा काही हिशोब आहे ? नोकरीसाठी मुंबईत झालेल्या स्थलांतरामुळे किती घरांना कुलपे लागली याची काही मोजदाद आहे? मुलाला नोकरी नाही, म्हणून हजारो तरुणांच्या डोक्याला बाशिंग लागलेले नाही. पटसंख्या नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडल्या आहेत. आरोग्याची एक सुविधा इथले स्थानिक आमदार गेल्या १५ वर्षात उभे करू शकले नाहीत. अपघात झाला, गंभीर आजार झाला की गोवा किंवा कोल्हापूरच्या फेऱ्या ठरलेल्या आहेत. जिथे आरोग्य केंद्रे आहेत तिथे डॉक्टर नाही, नर्सेस नाहीत.”
“मालवण गोव्याशी स्पर्धा करू शकेल असं एकही पर्यटन केंद्र इथे उभारलं जाऊ शकल नाही. एक चांगला उद्योग उभा राहिला नाही. कुठला प्रश्न सुटला नाही. बोलावं तरी काय काय आणि किती किती ? आश्रित म्हणून जगण्याचं दुर्भाग्य या मतदारसंघाच्या नशिबी आलं, हेच दुदैवाने सत्य आहे. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र चव्हाण साहेव यांच्या रुपाने विकासाची आस असलेले नेतृत्व राज्याला लाभले आहे. विकासासाठी दोन्ही हातांनी निधी देण्याची दोघांचीही तयारी आहे. मात्र आमच्या सावंतवाडीचे विद्यमान आमदार हे १५ वर्षे आमदार व ८ वर्षे मंत्री असूनही ही विकासाची गंगा आपल्या सावंतवाडी मतदारसंघात आणू शकले नाहीत, हे वास्तव दुर्लक्षित कसं करणार? जो काही विकास निधी सावंतवाडी मतदारसंघात पोचला तो केवळ माननीय रवींद्र चव्हाण साहेब या सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यानंतरच.”
“असं का घडलं ? याला जबाबदार कोण? युतीची अगतिकता की आमची अनाग्रही भूमिका? यावेळी विचार व्हायलाच हवा मित्रानो… आणि तो तुम्ही सर्वांनी करायला हवा. मतदारसंघातल्या ७०% ग्रामपंचायती, तिन्ही नगरपरीषदा, १७ पैकी १४ जिल्हा परिषद, ३४ पैकी २८ पंचायत समिती, सोसायट्या भाजपाकडेच आहेत. तरीही आपण अगतिक का? मित्रपक्षांच्या पालख्या आपण का वाहायच्या ? विद्यमान आमदारांची निष्क्रियता सहन करून आपला मतदारसंघ दररोज मागे का ढकलायचा ? भावी पिढ्यांचं भविष्य उद्यस्त का करायचं ? हे एकदा ठरवायला हवं.. आणि ते आजच ठरवायला हवं!”
“गेल्या ३५ वर्षांपासून मी सार्वजनिक जीवनात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, विधानपरिषद आमदार झाल्यापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाला मी मदत केली. येईल त्याला साथ दिली. माझ्या संपर्काचा फायदा प्रत्येकाला व्हावा याची दखल घेतली. २०१४ साली मी भाजपात आलो. सावंतवाडी तालुक्यात एकट्या बांदा शहरात मजबूत असलेली भाजपा संपूर्ण मतदारसंघात तुमच्या सर्वाच्या सहकायनि पोहोचली. अर्थात भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मला साथ दिली त्यांचा मी ऋणी आहे. २०१९ साली चिन्ह नसतानाही मला मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या ३० हजारावरून ५७ हजारावर गेली. एबी फॉर्म देऊनही पक्षाचा आदेश मानून मी एबी फॉर्म दिला नाही, कमळ चिन्ह असतं तर काय झालं असतं याचा विचार करा आणि मतदानाच्या आकडेवारी वरून कोणी विरोधात काम केले हे पहा.”
“आज लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली मते आहेत ८५ हजार आणि विनायक राउत (उबाठा) यांना मिळालेली मते आहेत ५३ हजार. ५३ हजार हा मूळ शिवसेनेचा आकडा २००४ पासून कधीही हललेला नाही, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तो ६९ हजार इतका होता. याचा सरळ अर्थ विद्यमान आमदारांबरोबर शिवसेना (उबाठा) चे कार्यकर्ते आलेले नाहीत. त्यामुळे त्यांची फक्त १६ हजार मते महायुतीत आली आहेत आणि भाजपची हक्काची ६८ हजार मते आहेत. आता सरळ सवाल असा आहे की, ६८ हजार हक्काची मते भाजपची असताना भाजपने शरणागती का पत्करायची ? हा विचार तुमच्यापैकी प्रत्येकाने करायला हवे… नेत्यांना पटवून द्यायला हवे… आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिंकलं आहे. आपण कमळ चिन्हावर सावंतवाडी सुद्धा जिंकू… नक्की जिंकू”.
“खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण असे नेते आपल्याला लाभले आहेत. प्रत्येकाची विकासाची अशी स्वतंत्र दृष्टी आहे. तिचा लाभ आपल्या मतदारसंघाला व्हायलाच हवा. कारण आणखी उशीर आपल्या मतदारसंघाला परवडणारा नाही आणि आज नाही तर कधीच नाही. गंभीर होऊन विचार करा. वेळ आपल्या हातात आहे. पक्षाच्या नेत्यांना हे पटवून देऊया, या मतदार संघात भाजपची ताकद आहे, हा मतदार संघ भाजपला मिळायला पाहिजे, असा आग्रह पक्ष श्रेष्ठींकडे करुया.”
