महाराष्ट्रात काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधला वाद विकोपाला, महापालिकेत आता काँग्रेस अंतर्गत स्वतंत्र गट होणार स्थापन
महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अशावेळी काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. पण इथे उलट घडतय. काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांमध्येच वाद विकोपाला गेलाय, त्यामुळे महापालिकेत आता काँग्रेस अंतर्गत स्वतंत्र गट स्थापन होणार आहे.

जानेवारी महिन्यात राज्यात महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. यात बहुतांश ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळालं. अपवाद फक्त विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याचा. चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वात जास्त जागा जिंकून काँग्रेस मोठा पक्ष ठरला. 66 सदस्यांच्या चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेसने सर्वाधिक 27, भाजपने 23, उद्धव सेनेने 6, शेकापने 3, वंचित 2, अपक्ष 2 आणि अन्यांनी एक-एक जागा जिंकली. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एकत्र असल्याने काँग्रेसला स्वत:चा महापौर बसवण्याची संधी होती. पण चंद्रपूरात नगरसेवक निवडून आले, त्या दिवसापासून काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीने जोर धरला. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार या दोन गटांमध्ये नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची विभागणी झाली.
परिणामी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एकामताने बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या सोनाली महाडूळे यांचा अवघ्या एक मताच्या फरकाने पराभव केला. काँग्रेसला संधी असूनही महापौर पद मिळवता आलं नाही. त्यानंतर आताही धानोरकर गट विरुद्ध वडेट्टीवार गट संघर्ष मिटलेला नाही. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे धानोरकर गटाचे नगरसेवक वेगळा गट स्थापन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचणार आहेत. वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अडूर यांच्याविरोधात 16 नगरसेवक एकवटले आहेत.
हा वाद पुन्हा उफाळला आहे
धानोरकर यांच्याकडून वेगळा गट स्थापन करत समर्थक नगरसेवकांचा गटनेता बदलण्याचा ठराव पारित केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे गटनेता बदलासाठी मंगळवारी विभागीय आयुक्तांची भेट घेणार आहेत. महानगरपालिकेत सत्ता स्थापन करतानाही गटनेता धानोरकर किंवा वडेट्टीवार गटाचा होणार यासाठी चांगलाच वाद तापला होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता. मात्र आता हा वाद पुन्हा उफाळला आहे. काँग्रेसच्या 27 पैकी 16 नगरसेवक गटनेते राजेश अडूर यांच्याविरोधात आहेत. चंद्रपूर काँग्रेसमध्ये धानोरकर-वडेट्टीवार गटांतील संघर्ष पुन्हा उफाळला आहे. बहुमताच्या जोरावर नवा गटनेता निवडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस मधील ही अंतर्गत गटबाजी पक्षासाठी हानिकारक ठरणार आहे.
