मंत्री असो वा आमदार, मैदानात उतरावेच लागणार… एकनाथ शिंदेकडून मोठे फेरबदल, कोणाचा पत्ता कट?
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष विस्तारासाठी कंबर कसली असून, काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नारळ देण्याचा इशारा दिला आहे.

निवडणुका आता संपल्या आहेत, मात्र आता पक्ष वाढीचा खऱ्या अर्थाने हंगाम सुरू झाला आहे. राज्यात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा आणि जनतेचे प्रश्न तत्परतेने सोडवा, असे स्पष्ट निर्देश शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबईत आयोजित शिवसेनेच्या महत्त्वाच्या ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून पद काढून घेतले जाईल, असा कडक इशाराही दिला आहे.
संघटनात्मक बांधणीसाठी रोडमॅप
राज्यात पक्षाचा विस्तार अधिक प्रभावी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण भागातील संघटना मजबूत करण्यावर विशेष भर दिला आहे. गावागावांत शाखांचे जाळे विणणे, नवीन सदस्य नोंदणी मोहीम राबवणे आणि जास्तीत जास्त युवकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. लोकप्रतिनिधींनी केवळ पदावर न राहता सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्ष कार्यात योगदान द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपली पदे विसरून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मैदानात उतरावे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
गावागावांत शाखा विस्तार करणे, नवीन सदस्य नोंदणी वाढवणे आणि तरुणांना पक्षात मोठ्या संख्येने सामील करून घेण्याचे उद्दिष्ट एकनाथ शिंदे यांनी पक्षासमोर ठेवले आहे. निवडणूक आयोगाच्या एसआयआर (SIR) मोहिमेच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी कामाचा आढावा घेतला. प्रत्येक मतदार संघाचे विभाजन लक्षात घेऊन मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यासाठी प्रत्येक बूथवर दोन बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नियुक्त करावेत आणि त्यांच्याशी दररोज संवाद साधावा, असे त्यांनी बजावले आहे.
त्यासोबतच पक्षाची संघटन रचना सक्षम करण्यासाठी काही तांत्रिक बाबींवरही लक्ष द्या. लोकसभा संपर्कप्रमुखांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची स्वतंत्र बैठक घ्यावी. या बैठकीचे फोटो आणि सविस्तर तपशील पाठवावे, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ज्या पदाधिकाऱ्यांकडे कामाचा अहवाल नसेल किंवा जे कामात कसूर करतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असाही इशारा एकनाथ शिंदेंनी दिला.
पक्ष वाढीचा खरा मार्ग कोणता?
विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करणे ही कार्यकर्त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच शासकीय योजनांची माहिती शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देणे, हाच पक्ष वाढीचा खरा मार्ग आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या संपर्कप्रमुखांच्या यादीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री योगेश कदम, भरत गोगावले, संजय राठोड, आमदार निलेश राणे आणि किरण सामंत यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या सर्वांना आपापल्या कार्यक्षेत्रात विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करण्याची आणि शासकीय योजनांची माहिती घराघरांत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
