Rain Alert : मुसळधार पावसाने वाढवली धास्ती; राज्यात 13 जणांचा मृत्यू, मुंबईतील उद्यानं आज राहणार बंद
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीत आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला असून, 100 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, पूरस्थितीमुळे शेकडो कुटुंबे विस्थापित झाली आहेत. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मुंबईतील सर्व सार्वजनिक उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांतील विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 13 जणांनी जीव गमावला असून 10 जण जखमी झाले आहेत. पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत सुमारे 100 घरांचेही नुकसान झाले आहे. पूरस्थितीमुळे शेकडो कुटुंब बेघर झाली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले असल्याची माहिती राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिली. तर भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी शहरातील सर्व सार्वजनिक उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरज नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं, तसेच उद्यानांना भेट देऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
गेल्या 24 तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक 236 मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर ठाणे (161 मिमी), रत्नागिरी (152 मिमी) आणि पालघर (132 मिमी) येथेही जोरदार पाऊस झाला. लोणावळ्यात गेल्या 48 तासांत तब्बल 625 मिमी (24.71१ इंच) पावसाची नोंद झाली असून मुंबईतही 100 ते 161 मिमी दरम्यान पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान सतत पडणाऱ्या पावसामुळे उल्हास, काळू आणि पिंजाळ नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर अंबा, सावित्री, कुंडलिका, पातळगंगा, जगबुडी आणि उल्हास नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे बदलापूर, मोहणे आणि जांबूळपाडा परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, माथेरान, लोणावळा, खोपोली आणि लोहगड परिसरात भूस्खलनाचा धोका वाढल्याने प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई व उपनगरांत नागरिकांचा मृत्यू , झाडेही पडली
उल्हास, काळू, पिंजाळ या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर अंबा, सावित्री, कुंडलिका, पातळगंगा, जगबुडी, उल्हास या नद्यांनी धोका पातळी ओलांडल्याने बदलापूर, मोहणे, जांबूळपाडा या परिसराला पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील मानखुर्द भागात झोपडपट्टीवर इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. तर उपनगरात झाड पडून एकाचा मृत्यू झाला. ठाण्यात इमारतीचा भाग कोसळून दोन जण जखमी, पालघरमध्ये पाण्यात पोहताना बुडून एकाचा मृत्यू झाला असून सातारा जिहयातही दरड कोसळून एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी झाल्याची घटना घडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्यात बूडून एकाचा मृत्यू झाला असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 30 पडझड झाली आहे
मुंबईतील सर्व उद्यानं आज बंद, पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना
भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी शहरातील सर्व सार्वजनिक उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उन्मळून पडणे आणि अपघात होण्याचा धोका लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली आहे.
अलीकडच्या काही दिवसांत मुंबईत झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 30 जून रोजी चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड पडून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 5 जुलै रोजी झाड पडून गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. तर 2 जुलै रोजी सांताक्रूझ येथे झाड पडून आठ कामगार जखमी झाले होते, एवढंच नव्हे तर मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी येथे झाड पडून सोमवारी सात जण जखमी झाले.
मुंबईत मंगळवारी सोसाट्याच्या वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून त्यामुळे झाडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, तसेच उद्यानांना भेट देऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. हवामानाचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
