IMD Weather Update : मोठं अस्मानी संकट, पुढील 48 तास धोक्याचे, मुसळधार पावसाचा हाय अलर्ट
पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, या काळात वाऱ्याचा वेग देखील प्रचंड राहणार आहे.

हळुहळु थंडी कमी होत आहे, तापमानात वाढ झाली असून, उन्हाळ्याची चाहुल जाणवू लागली आहे, मात्र याचदरम्यान वातावरणात मोठा फेरबदल पहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 9 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील चार दिवस 9 राज्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच काळात हवेचा वेग देखील जास्त असणार आहे, पावसासोबतच 40 ते 45 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुढील दोन ते तीन दिवस गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सिअस अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.
कोणत्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 16 तासांमध्ये 9 राज्यात पावसाला सरुवात होण्याची शक्यता आहे. पावसासोबतच हवेचा वेग देखील जास्त राहणार असल्यामुळे हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, आयएमडी (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटं, छत्तीसगड, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये 23 फेब्रुवारीपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसासोबतच बर्फावृष्टीची देखील शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी तामिळनाडू आणि केरळमध्ये हवेचा वेग जास्त राहणार असून, प्रति तास 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात या दोन राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रामध्ये तापमानात वाढ होणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. राज्यात आता उन्हाळ्याची चाहुल जाणवू लागली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
