‘गृहमंत्र्यांकडून कन्यादान, जिल्हाधिकाऱ्यांकडून वराचं पालकत्व’, नागपुरात अनाथ मूक-कर्णबधिर जोडप्याचा अनोखा विवाह
नागपुरात एक असा वेगळा विवाह सोहळा पार पडला ज्यात मुलीचं कन्यादान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं, तर मुलाचं पालकत्व नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी घेतलं.
नागपूर : नागपुरात एक असा वेगळा विवाह सोहळा पार पडला ज्यात मुलीचं कन्यादान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं, तर मुलाचं पालकत्व नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी घेतलं. महत्वाचं म्हणजे वधू आणि वर दोघंही अनाथ असून मूक आणि कर्णबधिर आहेत. बघूया सामाजिक बांधिलकीच्या या विवाह सोहळ्याची ही खास गोष्ट (Kanyadan of Orphan girl by Home Minister Anil Deshmukh and his wife in Nagpur).
नागपूरमधील हा विवाह सोहळा एका सामाजिक दायित्वाची जाणीव करून देणारा ठरला. शंकर बाबा पापडकर यांच्या अनाथ आश्रमातील अनाथ मूक आणि कर्णबधिर तरुण आणि तरुणीने लग्नाचा निर्णय घेतला. मुलगी वर्षा ही 23 वर्षांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकावर बेवारस आढळली होती, तर मुलगा समीर हा डोंबिवली स्थानकावर मिळाला होता. शंकर बाबा यांनी आपल्या 100 पेक्षा जास्त अनाथ मुलांप्रमाणे यांचंही पालन पोषण केलं. शिक्षण दिलं नोकरी लावून दिली आणि आज त्यांना विवाह बंधनात बांधलं. हा शंकर बाबांच्या 23 व्या मुलीचा विवाह होता. या विवाह सोहळ्याप्रमाणे इतरांनी सुद्धा पुढे येऊन अशा मुलांच्या जीवनात हे क्षण आणावे असं आवाहन केलं.
उद्या नागपूर येथील सदभावना लॉन्स येथे वर्षा आणि समीर यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. मी सपत्नीक वर्षाचे कन्यादान करणार आहे. त्यानिमित्ताने आज माझ्या सौभाग्यवती आरती देशमुख आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत वर्षाचा हळदी समारंभ संपन्न झाला. pic.twitter.com/31ZSgDoaGL
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) December 19, 2020
अनाथ मुलांचे पालक शंकर बाबा पापडकर यांनी या विवाहाला स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित राहून कन्यादान केल्यानं समाधान आणि आनंद व्यक्त केला. हा विवाह सोहळा एखाद्या श्रीमंताच्या सोहळ्यापेक्षा किंचितही कमी नव्हता. उलट यात सामाजिक जाणिवेची भावना होती. वर रथावर बसून मंडपात आला, तर वधू डोलीतून भव्य दिव्ये असा सोहळा झाला. वधू पिता म्हणून राज्याचे गृहमंत्री उभे राहिले आणि त्यांनी कन्यादान केलं. अनिल देशमुख यांनी आपल्या मुलीच्या लग्न समारंभाप्रमाणे सर्व विधी पार पाडले. तसेच समाजातील नागरिकांना सुद्धा अशा अनाथ मुलांना आनंद द्यावा, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.
या विवाह सोहळ्यासाठी सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंना सुद्धा बोलावण्यात आलं होतं. या सोहळ्यातील वरही अनाथ आहे. त्याचं पालकत्व नागपूरच्या जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी घेत सगळे सोपस्कार पार पाडले. तसेच समाजातील नागरिकांनाही या कामात पुढे येण्याचं आवाहन केलं. कुटुंबातील सदस्यांसाठी तर सगळेच करतात, मात्र इतरांसाठी खास करून ज्यांचं कोणी नाही अशा अनाथ मुलांसाठी काही करण्याची इच्छा असेल, तर काय होऊ शकतं हेच या विवाह सोहळ्यातन दिसून आलं. या वधूवरांना टीव्ही 9 कडूनही खूप साऱ्या सदिच्छा.
हेही वाचा :
जेव्हा राज्याचे गृहमंत्री कन्यादान करणार!
जेव्हा भाजपचे माजी आमदार अजित पवारांचे आभार मानतात
शिक्षक-पदवीधर निवडणुकीतील पराभवाचे भाजपकडून चिंतन, तीन बडे नेते कारणं शोधणार
Kanyadan of Orphan girl by Home Minister Anil Deshmukh and his wife in Nagpur