Sanjay Raut : अंजली दमानियांना खरात प्रकरणातला खुराक मुख्यमंत्री कार्यालयातूनच? सरकारच्या टार्गेटवर कोण ? राऊतांचे एका दगडात दोन पक्षी
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. अंजली दमानिया यांनी खरातच्या राजकीय नेत्यांसोबतच्या कॉल डिटेल्सचा खुलासा केला, ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री कार्यालयातूनच ही माहिती दिली जात असल्याचा दावा केला आहे. सरकारमधील काही स्वकीयच निशाण्यावर असल्याचा राऊतांचा आरोप धक्कादायक आहे.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा असून महिलांवर अत्याचर करणाऱ्या खरातकडे राजकारणी, नेते, सेलिब्रिटी हे त्याच्याकडे यायचे अशी माहिती समोर आली. त्याचं राजकीय कनेक्शनही उघड झालं होतं. त्यातच काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही मोठे खुलासे केले असून खरातला कुणाचे सर्वाधिक फोन कॉल झाले, कोणत्या नेत्याशी तो कितीवेळ बोलला, त्याने कोणत्या नेत्याला कितीदा फोन केले, तर त्याला कोणत्या नेत्याने कितीवेळा फोन केला, त्यांचं किती वेळ बोलणं झालं, अशी A to Z माहिती त्यांनी दिली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरातल 17 कॉल तर रुपाली चाकणकरांचे त्यांना 177 कॉल झाल्याचे दमानिया यांनी उघड केलं. मात्र यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे.मुख्यमंत्री कार्यालयातूनच त्यांना ही माहिती दिली जाते, असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
फडणवीसांनी धरलाय निशाणा, ती व्यक्ती..
अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, RAW च्या प्रमुख नाहीत, किंवा महाराष्ट्राचं जे इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे, त्याच्या प्रमुख आहेत का ? तर तसं नाही. म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय पोहोचणार नाही. इतकी गुप्त माहिती जी आहे, ती कोणीही व्यक्तीगत माणूस देऊ शकत नाही. आता त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे, भाजपचे संबंध आहेतच, हे तुम्ही अमान्य करू शकत नाही. त्यामुळे तरीही त्यांच्या माध्यमातून सरकार जर ही माहिती बाहेर काढत असेल तर याचा अर्थ असा की सरकारच्या टार्गेटवर कोणीतरी आहे, असा दावा राऊत यांनी केला. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एक निशाणा धरला आहे. तो निशाणा काय आहे, ते तुम्हाला कळेल, असं राऊत म्हणाले.
सरकारच्या टार्गेटवर कोणीतरी आहे
पण मग त्यांच्या टार्गेटवर स्वकीय आणि मित्रपक्षही आहेत का, असा सवाल राऊतांना विचारण्यात आला. जेव्हा बाह्यशक्तींकडून धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते, तेव्हा स्वकीय जास्त टार्गेटवर असतात. जेव्हा बाह्यशक्ती, पोलिसांकडून नाही, बाह्यशक्तींकडून शासकीय, गोपनीय माहिती जेव्हा जनतेपर्यंत, लोकांपर्यंत दिली जाते प्रसिद्धीमाध्यमांना, याचा अर्थ सरकारमधल्या लोकांच्या निशाण्यावर स्वकीय आहेत, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला.
राऊतांच्या या विधानाने मोठी खळबळ माजली असून आता याप्रकरणात पुढे आणखी काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
