बाळासाहेब ठाकरेंचा दाखला देत कुणाल कामराने केली बोलती बंद, म्हणाला उद्धव ठाकरे, शरद पवारही…
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांनी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर राजकीय व्यंग्याचे समर्थन केले. बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाचा दाखला देत माफी मागण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि महाराष्ट्र विधान परिषदेची विशेषाधिकार समिती यांच्यातील संघर्ष आता एका नवीन वळणावर येऊन पोहोचला आहे. कुणाल कामरा यांनी नया भारत या शोमध्ये भोली सी सूरत या गाण्याचे विडंबन केले होते. या सादरीकरणातून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थट्टा उडवली होती. तसेच विधानसभेचा अपमान केला, असा आरोप त्यांच्यावर आहे. आता याप्रकरणी विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीची सुनावणी पार पडली. या सुनावणीत कुणाल कामरा यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट पवित्रा घेत राजकीय व्यंग्यावरील कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. राजकीय व्यंग हे लोकशाहीचा अविभाज्य भाग असून त्यावर गदा आणणे चुकीचे आहे, असे कुणाल कामरा यांनी ठणकावून समितीला सांगितले.
बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई झाली नाही
नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान कुणाल कामरा यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः एक महान व्यंगचित्रकार होते. त्यांनी आयुष्यभर नेत्यांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली, पण कधीही त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे, टीका करणे हा लोकशाहीचा भाग आहे. जर तेव्हा त्यांच्यावर ही कारवाई झाली असती, तर आज आपण त्यांची व्यंगचित्रे पाहू शकलो असतो का? असा सवाल कुणाल कामरा यांनी केला.
फक्त मलाच टार्गेट का केले जात आहे?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या विचारधारेचा दावा करतात, तो मूळ विचारांवर आणि टीकेवर आधारित आहे. मग आजच्या काळात कलाकारांना का गप्प केले जात आहे? असेही कुणाल कामराने म्हटले. यावेळी त्यांना देशद्रोही या शब्दाबद्दल विचारणा करण्यात आली होती. यावरही त्याने खुलासा केला. देशद्रोही हा शब्द मी माझे वैयक्तिक मत म्हणून वापरला होता. हा शब्द अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी, अगदी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनीही सार्वजनिक रॅलीमध्ये वापरला आहे. मग फक्त मलाच टार्गेट का केले जात आहे? असा सवाल कुणाल कामराने केला.
यावेळी विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी त्यांना माफी मागण्यास सांगितले. मात्र कुणाल कामराने स्पष्ट नकार दिला. मी माफी मागितली तर ते ऐक ढोंग ठरेल. जर मी माफी मागितली, तर भविष्यात कोणताही कलाकार सरकारवर टीका करायला घाबरेल. हे लोकशाहीसाठी घातक आहे. यामुळे कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल आणि एक चुकीचा पायंडा पडेल, असे कुणाल कामराने म्हटले.
राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा
या सुनावणीनंतर कुणाल कामराने सोशल मीडियावरही त्याची स्पष्ट भूमिका मांडली. लोकशाही संस्थांचा वापर करून नागरिकांचा किंवा कलाकारांचा आवाज दाबणे हे चुकीचे आहे. उपहास किंवा व्यंग म्हणजे अपमान नव्हे, तर तो लोकशाहीतील टीकेचा एक मार्ग आहे. जर कलाकारांना भीतीदायक वातावरणात काम करावे लागले, तर समाजातील मुक्त विचारांची परंपरा कायमची नष्ट होईल, अशी भीती मला वाटते, असे कुणाल कामरा म्हणाला. दरम्यान सध्या या प्रकरणाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून, विधान परिषद समिती यावर आता काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
