Devendra Fadnavis : मला विश्वास आहे की, वहिनी देखील..अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis : "दादांचा जन्म राहुरी तालुक्यातला होता. दादांचे मामा कदम हे कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कुटुंब होतं. त्यांचे मामा आरएसएसचे पदाधिकारी होते. दादांच बालपण मामाच्या घराकडे गेलं असल्याने त्यांच्या कार्याची जाणीवदेखील होती"

“लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा आम्हाला कमी जागा मिळाल्या. मविआला चांगला विजय मिळाला. त्यानंतर आम्ही तिन्ही पक्षांचे नेते, अजितदादा, शिंदेसाहेब आणि मी आम्ही गांभीर्याने दौरे चालू केले. जास्तीत जास्त लोकापर्यंत कसं पोहोचता येईल हा प्रयत्न असायचा. शिंदेसाहेब आणि मी फिरतच होतो. पण त्यावेळी सर्वात जास्त फिरलेले अजितदादा होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांनी घर जे सोडलं, ते रोज एकही दिवस असा नाही की ते कुठल्या जिल्ह्यात गेले नाहीत. सातत्याने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्यांचे आमदार, सदस्य, माजी आमदार असतील, पदाधिकारी असतील तिथे सभा घ्यायचे. कार्यक्रम करायचे त्यातून पक्षाला त्यांनी एक आत्मविश्वास देण्याचं काम अजितदादांनी केलं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोक प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.
“खर म्हणजे दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र तर हळहळला आहेच. पण त्यांच्या कुटुंबाला, सुनेत्रा वहिनींना जे दु:ख झालं ते आपण समजू शकतो. पण या कठीण परिस्थितीतही वहिनींनी अतिशय धीरोदत्तपणे त्याचं कार्य पुढे नेण्यासाठी कठोर निर्णय घेतला. अत्यंत संयमी, घरंदाज पद्धतीने त्यांनी हे कार्य हातामध्ये घेतलं आहे. आपण सर्व, आपल्या सदभावना त्यांच्या पाठीशी आहेत. राजकीय क्षेत्रात व्यक्तिगत वेदना बाजूला ठेऊन समाज, राज्य याचा विचार करत आपल कर्तव्य त्याठिकाणी बजावत रहावं लागतं. मला विश्वास आहे, वहिनी देखील दादांसारखी आपली वेगळी प्रतिमा तयार करतील. त्याचं दृढतेने काम करतील” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दादांचे मामा कदम हे कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कुटुंब
“दादांचा जन्म राहुरी तालुक्यातला होता. दादांचे मामा कदम हे कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कुटुंब होतं. त्यांचे मामा आरएसएसचे पदाधिकारी होते. दादांच बालपण मामाच्या घराकडे गेलं असल्याने त्यांच्या कार्याची जाणीवदेखील होती” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “काँग्रेसचे विचार, पवारसाहेबांचं नेतृत्व त्यातून दादा पुढे आले. शिक्षण झाल्यावर दादांनी शेतीची सुरुवात केली. टोमॅटोची लागवड, दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन ही काम दादांनी स्वत: केली. मार्केटिंग , बाजारात वस्तू पोहोचवणं हे सर्व केलं. जमिनीतून उठून मोठं होणं म्हणतो आपण अशा प्रकारचं कार्य दादांनी केलं. म्हणून सामान्य माणसांच्या अडचणींची जाणीव त्यांना होती” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
