राजा, आता तरी बरस… बळीराजाचे देवाला साकडे, पेरण्या झाल्या पण पाऊस कुठंय?
Farmer and Monsoon : जूनचा दुसरा आठवडा संपत आला आहे पण अजूनही आभाळाने दार उघडलेलं नाही. पावसाचा एकही थेंब जमिनीवर पडलेला नाही, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरूवात झालेली नाही. पावसाअभावी शेतकरी अडचणीत सापडू लागला आहे. जूनचा दुसरा आठवडा संपत आला आहे पण अजूनही आभाळाने दार उघडलेलं नाही. पावसाचा एकही थेंब जमिनीवर पडलेला नाही. इकडे शेतकऱ्याने मात्र आशेच्या भरवशावर शेत तयार करून ठेवले आहे. मशागत पूर्ण केली, खत-बियाणे घरात आणून ठेवले, पण आभाळाकडे पाहणारे त्याचे डोळे अजूनही प्रतीक्षेतच आहेत. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच स्थिती आहे.
संभाजीनगरमधील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा
बळीराजासाठी पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तर त्याच्या संसाराचा श्वास आहे. याच पावसावर लेकरांच्या शिक्षणाची स्वप्नं अवलंबून आहेत. मुला-मुलींच्या लग्नाची जबाबदारी अवलंबून आहे. घरखर्च, दवाखाना आणि वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा अवलंबून आहे. आज शेतात उभा असलेला शेतकरी काळ्या ढगांची वाट पाहतोय. आभाळाकडे पाहतोय आणि मनोमन एकच प्रार्थना करतोय, “राजा, आता तरी बरस…” कारण जमिनीला ओल हवी आहे, पण त्याहून जास्त ओल या शेतकऱ्याच्या कोरड्या पडलेल्या आशांना हवी आहे. बळीराजा आज चातकाप्रमाणे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या भिमवाडीतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
बुलढाण्यातील शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे
दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरीही पावसाकडे डोळे लावून बसला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे आटोपून तयार ठेवली असून पेरणीची तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र जून महिना अर्धा संपला, रोहिणी नक्षत्र संपले, मृग नक्षत्र सुरू आहे , मात्र पावसाची अपेक्षा लागून आहे . पाऊस पडत नसल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे उघडा ठेऊन उभा आहे. जर लवकर पाऊस पडला नाही, तर उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. देशाच्या काही भागात दुष्काळाचीही भीती आहे. त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. यामुळे थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो.
