Maharashtra News LIVE : बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग, सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार
मुंबईतील वाढते तापमान, आजच्या रेल्वे मेगाब्लॉकचे वेळापत्रक आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करता येणार आहे. यासह देश विदेश, महाराष्ट्र, क्रीड, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES
-
एकनाथ शिंदेंचा दौरा, धाराशिवमध्ये वातावरण तापले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे,शिवसेनेचे काही पदाधिकारी नजर कैदेत ठेवले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे आज धाराशिव येथे पत्रकार संघाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहणार आहेत.
-
परप्रांतीयाचा मराठी तरुणावरती रेल्वेमध्ये जीवघेणा हल्ला
ठाणे रेल्वे स्थानकात आठ एप्रिल मारहाणीची घटना घडली असून या मध्ये एका तरुणावरती ठोशाबुक्क्याने जीव घेणा हल्ला बाप आणि मुलाने केला आहे. यामध्ये अमित पिरनकर गंभीर जखमी झाला असून डोळ्यावर आणि तोंडावर मारल्यामुळे कायदेशीर तक्रारी वरून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बाप आणि मुलांवरती गुन्हा दाखल करत अटक केली आहे. कामावरून घरी जात असताना अमित पीरणकर याला साहबलाल चौहान आणि मुलगा सुमित चौहान याने मारहाण केली होती.
-
-
गायमुख ते कॅडबरी मेट्रो सेवेला विलंब?
गायमुख ते वडाळा 32 किलो मीटर मेट्रो चार मार्गिकेचे त्यापैकी गायमुख ते विजय गार्डन अशी 22 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजप आमदार संजय केळकर यांच्या कडून ट्रायल रन मेट्रो चालवण्यात आली होती. मात्र नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2026 पर्यंत गायमुख ते कॅडबरी अशी मेट्रो सेवा सुरू होणार होती मात्र कारशेड आणि इतर कारणामुळे विलंबन लागत असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणेकरांना घोडबंदर वाहतूक कोंडी पासून मुक्तता मिळावी म्हणून मेट्रो चार मार्गिका खुली करण्यात येणार होती. आता येणाऱ्या काळात तरी मेट्रो चार सुरू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची लोकल विस्कळीत
नायगाव ते भाईंदर ओहरहेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची लोकल विस्कळीत झाली आहे. लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत असल्याने रेल्वे स्टेशन वर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. आज सकाळ च्या वेळेत विरार ते चर्चगेट जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे
-
सोलापुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय
काल सोलापूर जिल्ह्यात 41.4 डिग्री सेल्सीयस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक उच्चांकी तापमान असल्याचा पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलीय. तर शहरातील सिग्नल दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलेय. दरम्यान आगामी काळात सोलापूरचे तापमान आणखी किती वाढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
-
-
उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण
लाल कांद्यानंतर नव्याने निघत असलेल्या उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. उन्हाळी कांद्याला आठ ते बारा रुपये दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे शेतकऱ्यांसाठी मुश्किल झाले आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.
-
भाजप-शिवसेना आमदार आमदारांमध्ये श्रेयवाद
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व लोखंडवाला आणि सिंह इस्टेट जोडणाऱ्या १२० फूट डीपी रस्त्याचे भूमिपूजन केले. कांदिवली लोखंडवाला १२० फूट डीपी रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यात भाजप-शिवसेना आमदार आमदारांमध्ये श्रेयवाद रंगला. कांदिवली पूर्व लोखंडवाला येथून ठाकूर गावाकडे जाणाऱ्या १२० फूट डीपी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळताच भाजप आमदार अतुल भातखळकर आणि शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या श्रेय घेण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत.एवढेच नाही तर काल मागाठाणे विधानसभाचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी १२० फूट डीपी रोडचे आज भूमिपूजन पण केले.
-
-
धाराशिवमध्ये शिंदे दौऱ्यापूर्वी अंतर्गत गटबाटी उफाळली, पोलीस प्रशासन अलर्टवर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. संभाव्य तणाव टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून, आज सकाळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे-पाटील यांना शिरढोण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही प्रतिबंधात्मक कारवाई असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शिंदे यांच्या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
-
अखेर नरभक्षक वाघ जेरबंद, चंद्रपूरच्या नागरिकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास!
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत पसरवणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. तळोधी (बा.) वन परिक्षेत्रात या वाघाने धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे, २५ मार्च रोजी सावर्ला परिसरातील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या प्रमिला अरुण वाटगुरे (४५) या महिलेवर वाघाने प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार केले होते. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि परिसरातील नागरिकांनी या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली होती. नागरिकांचा वाढता दबाव लक्षात घेता वनविभागाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली होती. अखेर वनविभागाच्या पथकाने या वाघाला जेरबंद केल्याने तळोधी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
-
नाशिक आयटी कंपनी लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरण, फरार महिला आरोपीचा शोध सुरू
नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील संशयित महिला आरोपी निदा खान ही अद्याप फरार असून, तिला अटक करण्यासाठी विशेष तपास पथकाने (SIT) कंबर कसली आहे. प्राथमिक तपासानुसार, निदा खान स्वतः महिला असल्याने ती इतर हिंदू महिला कर्मचाऱ्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होती. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी SIT ची दोन विशेष पथके पुणे आणि नाशिकमध्ये गोपनीय शोध मोहीम राबवत आहेत. निदा खानच्या अटकेनंतर कंपनीत हिंदू तरुणींसोबत नेमके काय प्रकार घडत होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात आहेत, याचा मोठा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून, पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीची प्रक्रिया सुरू आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर; खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत एकाच मंचावर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते धाराशिव येथे आयोजित पत्रकार संघाच्या एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले, आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित असतील. या दौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर एकाच मंचावर येणार आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची मोठी चर्चा रंगली आहे. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते धाराशिव शहरातील बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असून, नूतन जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
-
सुनेत्रा पवारांच्या प्रचार शुभारंभाचा आज नारळ फुटणार, कन्हेरीतून वाजणार प्रचाराचे बिगुल
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज सकाळी १० वाजता बारामती तालुक्यातील कन्हेरी येथून होणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री अदिती तटकरे, आमदार सरोज अहिरे, आमदार सना मलिक, आमदार शंकर मांडेकर आणि आमदार सुनिल शेळके यांच्यासह महायुतीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या प्रचार शुभारंभाच्या नारळ वाढवल्यानंतर आयोजित जाहीर सभेच्या माध्यमातून सुनेत्रा पवार मतदारांशी संवाद साधणार असून, प्रचाराची धुरा अधिक वेगाने पुढे नेणार आहेत.
-
१ मे रोजी विदर्भात काळा दिवस, स्वतंत्र राज्यासाठी विदर्भवाद्यांचा आक्रमक पवित्रा
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विदर्भवाद्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण विदर्भात ‘काळा दिवस’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भवादी नेते वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली ही घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रात राहून विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरदारांना न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने, आता आंदोलनाचे हत्यार उपसून निषेध नोंदवला जाणार आहे. विदर्भातील नागरिक आणि सर्व घटकांना हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे विदर्भवाद्यांचे म्हणणे आहे.
-
नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचा वादग्रस्त निर्णय, सभापतींसाठी आलिशान वाहनांवर ६० लाखांचा अतिरिक्त खर्च
नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने ९ विषय समिती सभापतींसाठी आलिशान वाहने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे ६० लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. प्रशासनाने यापूर्वीच महापालिका अधिनियमात अशा सुविधेची तरतूद नसल्याचे स्पष्ट करून तांत्रिक आक्षेप नोंदवले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सध्या महापालिका आर्थिक अडचणींचा सामना करत असताना हा अनावश्यक खर्च असल्याचा आरोप करत काँग्रेस नगरसेवक अभिजीत झा यांच्यासह विरोधकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे आणि हा निर्णय नियमबाह्य व मनमानी असल्याचे म्हटले आहे. याउलट, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी कामकाजात सुसूत्रता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी ही वाहन सुविधा आवश्यक असल्याचे सांगत निर्णयाचे समर्थन केले आहे.
आज मुंबईकरांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागणार आहे. एकीकडे वाढत्या तापमानामुळे शहरात उष्णतेची लाट जाणवत आहे, तर दुसरीकडे रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे, ज्याचा मोठा फटका आज प्रवासाला निघणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. तर राजकीय वर्तुळात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज सकाळी बारामतीतील कन्हेरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून आपल्या प्रचार मोहिमेचा नारळ फोडतील. या प्रचार शुभारंभाला महायुतीचे दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आज मोठी राजकीय शक्तीप्रदर्शनाची शक्यता आहे. यांसह आजच्या दिवसभरातील सर्व ताज्या घडामोडींसाठी लाइव्ह ब्लॉग अपडेट्स नक्की पाहा
Published On - Apr 12,2026 9:03 AM
