मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात; राज्यात कुठे कुठे पाऊस?
राज्यातील काही भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. आठवड्याभरानंतर सुरु झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती. अनेक जण आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. त्यानंतर आज शनिवारी अनेकांना पावसाने दिलासा दिला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, बीड, सोलापूर, अंबरनाथ, बदलापूर भागात पावसाने हजेरी लावली. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरीला लावल्याने राज्यासहित मुंबई, ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
मुंबई वेधशाळेने राज्यातील विविध भागात पावसाचा इशारा दिला होता. वेधशाळेने 17 जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ , वर्धा, नागपूर, भंडारा , गोंदिया, चंद्रपूर , गडचिरोली भागात पावसाची शक्यता वर्तवली होती. या भागात वेधशाळेने यलो अलर्ट दिला.
मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाला सुरुवात
वेधशाळेच्या अंदाजानंतर मुंबई, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोकण पट्ट्यातील भातरोपांना जीवदान मिळालं आहे. अनेक शेतकऱ्यांची पावसाअभावी भाताची पुनर्लागवड करण्याची कामे खोळंबली होती. पावसाने विश्रांती घेतल्याने काही ठिकाणी पुनर्लागवड करण्यात आलेला भात करपून जाण्यासही सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
तळकोकणात मुसळधार पाऊस
तत्पूर्वी, तळकोकणातही सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडीत शिरशिंगे गावातील धोंडवाडीतील तेरेखोल नदीला पूर आल्याची माहिती हाती आली आहे. या पुरामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. चौकुळ गावातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गावातील काही भागात रस्त्यावरून पाणी वाहत आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मुलांना आणि कामाला जाणाऱ्या नागरिकांचा एकच खोळंबा झाला. पावसाचा जोर ओसरल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. कोकणातील काही शहरी भागात सखल पाणी साचल्याचंही दिसून आलं. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागली.
