Maharashtra News LIVE : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
Maharashtra News LIVE : सोनम वांगचुक यांना आज सकाळीच पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी नेले. दिल्लीतील जंतरमंतरवर पोलिसांच्या या कारवाईने गोंधळ झाला. मुंबई-ठाण्यात पावसाने आज हजेरी लावली. नागपूरमध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन होणार आहे.

Maharashtra News LIVE : सोनम वांगचुक यांचे गेल्या 20 हून अधिक दिवसांपासून उपोषण सुरू होते. आज सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना उपोषण स्थळावरून उचलत उपचारासाठी रुग्णालयात नेले. 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याशी सरकारच्या प्रतिनिधीने यापूर्वी कोणतीही चर्चा केली नाही. यावेळी उपोषण स्थळावर मोठा गोंधळ उडाला. त्यांच्या समर्थकांना आवरताना पोलिसांचे नाकीनऊ आले. आंदोलनस्थळ तात्काळ रिकामे करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आज उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रण दिले आहे.
राज्यात काही ठिकाणी काल पावसाने अचानक हजेरी लावली. तर आज मुंबई, ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हजेरी लावली. तर राज्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात बड्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रात तीन मंत्रीपदं मिळावीत यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
LIVE NEWS & UPDATES
-
शिवसेना (यूबीटी) खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरण मंजूर
लोकसभा अध्यक्षांनी शिवसेना (यूबीटी) च्या सहा खासदारांना शिवसेना (शिंदे) मध्ये विलीन करण्यास मंजुरी दिली आहे. टीएमसीमधून फुटून एनसीपीआय स्थापन केलेल्या 20 खासदारांनाही लोकसभेत स्वतंत्रपणे बसण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
-
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नीचे निधन
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. श्वास घेण्यास त्रास, छातीत कफ आणि वयोमानानुसार होणाऱ्या इतर समस्यांमुळे त्यांना बंगळूर येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आम्ही अत्यंत दुःखाने कळवू इच्छितो की, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांची प्रकृती आधी सुधारत असूनही, आज दुपारी 4 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला.”
-
-
ममूटी आणि कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार
मल्याळम अभिनेते ममूटी (ब्रह्मयुगम) आणि कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन) यांची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली आहे, तर यामी गौतमला ‘आर्टिकल 370’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवडण्यात आले आहे.
-
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी ‘श्रीकांत’ची निवड झाली आहे, तर चित्रपट प्रकारात ‘परत 41 डिग्री छाया मगवार’साठी शिवपाल सिंग कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळेल. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी – अ सिम्बॉल ऑफ युनिटी’साठी आनंद एल. राय यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार दिला जाईल. याशिवाय, सर्वोत्कृष्ट लघुपट मराठी ‘हुमासफर’ आहे, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट सुमिरा रॉय दिग्दर्शित ‘भंगर’ आहे.
-
शास्त्रीनगर डॉक्टर मारहाण प्रकरणी २० जुलै रोजी IMA चा 24 तासांचा महाराष्ट्र बंद
शास्त्रीनगर डॉक्टर मारहाण प्रकरणानी IMA ने 24 तासांचा महाराष्ट्र बंद पुकारला आहे. डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ IMA ने २० जुलै रोजी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. 20 जुलै रोजी सकाळी 6 ते 21 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरातील OPD सेवा बंद राहणार आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपत्कालीन आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत. डॉक्टर संरक्षण कायदा अधिक कठोर करण्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा पुरवण्याची मागणी होत आहे.
-
-
शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी पंढरपुरात शेतकऱ्यांची सदबुद्धी दिंडी
शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी आज पंढरपुरात 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदबुद्धी दिंडी काढली.. या दिंडीमध्ये माजी मंत्री जयंत पाटील ,अमित देशमुख, सतेज पाटील, राजू शेट्टी, कैलास पाटील, अभिजीत पाटील, महादेव जानकर असे दिग्गज उपस्थित होते. पंढरपुरातील संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठलाला येत्या आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ रद्द करण्याची सद्बुद्धी देवो… अशा प्रकारचे साकडे घालण्यात आले. या सदबुद्धी दिंडीसाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी पंढरपुरात दाखल होते.
-
मुंबईत कांदिवली पुन्हा मुसळधार पाऊस सुरू
मुंबईच्या हवामानात पुन्हा बदल झाला असून कांदिवलीत अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी उपनगरांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे
-
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आज इंदापूर येथे मुक्काम
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा इंदापूर येथे मुक्काम आहे. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पहायला मिळत आहे. याठिकाणी संत तुकाराम महाराज यांचे यांचे रांगोळीच्या माध्यमातून चित्र रेखाटले असून आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
-
सोनम वांगचूक यांना उचलनं ही हुकूमशाही आहे – खासदार कल्याण काळे
दिल्लीच्या जंतरमंतरवर सोनम वांगचूक यांचं आंदोलन सरकारने बळाचा वापर करून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी केलीये. वांगचूक यांचं आंदोलन लोकशाही मार्गाने सुरु होतं. मात्र सरकारने पोलिसांचा बळाचा वापर करून वांगचूक यांना उचलं आहे. ही हुकूम शाही असून 2029 ची निवडणुकही हे सरकार होऊ देणार आहे की नाही असा प्रश्न पडला आहे.
-
सरकारने अंत पाहू नये, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया
सोनम वांगचुक हे दिल्लीत उपोषण करत आहेत. यावर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले की, ‘गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन सुरू असून सरकारने त्याचा अंत पाहण्याची भूमिका घेऊ नये.
-
राम रक्षा म्हणणं तुमचं काम, राम रक्षा करणं आमचं काम – उद्धव ठाकरे
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामरक्षा येते का असा प्रश्न विचारला होता. यावर आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. ‘मी त्यांच्या गावातच सांगतो, फडणवीस जी राम रक्षा म्हणणं तुमचं काम असलं तरी राम रक्षा करणं आमचं काम आहे. आम्ही राम रक्षक आहोत. मनात भाव नाही आणि राम रक्षा म्हणत आहेत. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. हे तुमचं आहे’
-
वाशिममध्ये पावसाला सुरुवात
वाशिमच्या रिसोड तालुक्यात काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, पंरतु आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्याने पिकांना संजिवनी मिळणार आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
महिला वकिलांचे फोटो एअरड्रॉपने मोबाईलमध्ये ट्रान्सफर, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली होती, या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी वकीलाने महिला वकिलांचे फोटो एअरड्रॉपने मोबाईलमध्ये ट्रान्सफर केले होते. या प्रकरणातील आरोपी वकिलाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
-
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ
आषाढी यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार आजपासून उजनी धरणातूनही सुमारे 1,600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग चंद्रभागा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आषाढी यात्रेच्या कालावधीत आता भाविकांना चंद्रभागा नदीच्या पात्रात स्नान करता येणार आहे.
-
सोनम वांगचूक यांच्या शरीरातील पाणी कमी, उपचार घेण्यास नकार
सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी माहिती दिली आहे. सोनम वांगचूक यांच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे. परंतु तरीदेखील वांगचूक यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
-
सीबीआयचे पथक आज पुन्हा लातूरमध्ये दाखल
लातूर : सीबीआयचे पथक आज पुन्हा लातूरमध्ये दाखल झाले आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या संदर्भाने काही चौकशी करण्याची शक्यता आहे. एक महिन्यानंतर पुन्हा सीबीआय लातूरमध्ये दाखल झाली आहे.
-
अमरावतीमधील हनुमान गढी येथे हनुमान चालिसा पठणासाठी नागरिक जमा होण्यास सुरुवात सुरूवात
अमरावतीमधील हनुमान गढी येथे हनुमान चालिसा पठणासाठी नागरिक जमा होण्यास सुरुवात सुरूवात झाली आहे. भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्याकडून हनुमान गढी येथे हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे.
-
डोंबिवली स्टेशनवर नागाची थरारक एंट्री! तिकीट खिडकीसमोर फणा काढून बसला; प्रवाशांची एकच गर्दी
डोंबिवली रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरवर भला मोठा नाग आढळल्याने एकच खळबळ उडाली. नागाने तिकीट खिडकीजवळ फणा काढून बसल्यामुळे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रकार लक्षात येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिसर रिकामा करून सुरक्षिततेची खबरदारी घेतली.
-
दहा दिवसांपासून पावसाची दडी; भडगाव-पाचोरा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
जळगाव जिल्ह्यातील भडगाव आणि पाचोरा तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणीनंतर आवश्यक असलेल्या पावसाअभावी सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी आणि कपाशीसह अनेक पिके संकटात सापडली आहेत. पिकांची वाढ खुंटू लागल्याने दुबार पेरणीचे संकटही शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.
-
नीट परिक्षेचा निकालात घोळ, मिरच्या वडवणी तालुक्यातील ज्ञानेश्वरीला 702 ऐवजी आले 87 मार्क
नीट पेपर फुटीनंतर नीट परीक्षा झाली मात्र यामध्ये देखील गुणांमध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील ज्ञानेश्वरी पवार हिने पेपर झाल्यानंतर ANSWER KEY नुसार चेक केले असता 702 गुण मिळत होते मात्र OMR शीट आल्यानंतर त्यामध्ये केवळ 87 गुण आले आहेत. ओ एम आर सीटच चुकीची असल्याचा आरोप ज्ञानेश्वरी हिने केला आहे. दरम्यान शिक्षण विभागाकडे तक्रार केली असून OMR सीट लाईव्ह दाखवावी अशी मागणी केली आहे. मोठ्या मेहनतीने आमच्या मुलीने अभ्यास केला. तीन दिवसांपासून मुलीला दररोज हॉस्पिटलमध्ये नेत आहोत. या निकालाचा मोठा धक्का तिला बसला आहे अशी प्रतिक्रिया तिच्या आईने दिली.
-
दुध भेसळ प्रकरणाच्या विरोधात रविराज साबळे रस्त्यावर उतरणार
भूम दुध भेसळ प्रकरणाचा तपास सखोल व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांनी घेतली आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट. शेतकऱ्यांना घेऊन दुध भेसळ प्रकरणाच्या विरोधात रविराज साबळे रस्त्यावर उतरणार. दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना भूम परिसरातील खावा उद्योगाला भेटी देण्याची केली मागणी
-
वर्ध्यात अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा
वर्ध्यात अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी. प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी.
-
जंतरमंतर येथे उपोषण करणाऱ्या अभिजीत दिपके यांच्यावर शाईफेक
नवी दिल्लीतील जंतरमंतर येथए उपोषण करणाऱ्या अभिजीत दिपके यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. CJP चे ससंस्थापक दिपके यांच्यालवरव अज्ञात तरूणीने शाई फेकली.
-
पंढरपूर – जयंत पाटील यांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम
पंढरपूर – . राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “एनडीएकडून आम्हाला कोणतेही निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्नच नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमधून आमची केवळ करमणूक होत आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
महायुतीत जाण्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या असून “आमचे आमदार शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने आहेत आणि पुढेही राहतील,” असं स्पष्ट केलं.
-
बूस्टर सीड्स कंपनीच्या कार्यालयावर प्रहारचं आक्रमक आंदोलन
छत्रपती संभाजीनगर- बूस्टर सीड्स कंपनीच्या कार्यालयावर प्रहारचं आक्रमक आंदोलन. बूस्टर सीड्स कंपनीचे सोयाबीन उगवत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर प्रहारच्या पतीने कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पेटलेला टेंबा घेऊन कार्यकर्त्यांचा बूस्टर सीड्स कंपनीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला, पेटलेला टेंबा हिसकावून घेताना पोलिस – कार्यकर्त्यांमध्ये थरारक झटापट झाली. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल राऊत आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
-
उद्धव ठाकरेंनी कुराणाचं पठण करावं – निलेशचंद्र मुनी
औरंगजेब आमचा भाऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंनी कुराणाचं पठण करावं असं निलेशचंद्र मुनी यांनी म्हटलं आहे. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून त्यांनी ही टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राम, असंही ते म्हणाले.
-
अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे शक्तीप्रदर्शन
अमरावतीमधील राजकमल चौकात उद्धव ठाकरें विरोधात भाजपचे शक्तीप्रदर्शन सुरू आहे. आमदार प्रवीण पोटे, राज्यसभा खासदार अनिल भोंडे, महापौर श्रीचंद तेजवाणी हे उपस्थित आहेत.
-
उद्धव ठाकरेंचे रामरक्षा आंदोलन हा केवळ राजकीय स्टंट – आमदार किशोर पाटील यांची टीका
उद्धव ठाकरेंचे रामरक्षा आंदोलन हा केवळ राजकीय स्टंट आहे अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केली.
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांपासून उद्धव ठाकरे भरकटले; काँग्रेससोबत युती करणाऱ्यांना रामरक्षा आंदोलनाचा नैतिक अधिकार नाही.
सोनम वांगचुक प्रकरणावर प्रशासनाच्या भूमिकेचे समर्थन करत विरोधक सहानुभूती आणि राजकारणासाठी मुद्दा वापरत आहेत असा आरोप आमदार किशोर पाटील यांनी केलाय.
-
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाच्या विरोधात अमरावतीमध्ये भाजपच्या आमदाराकडून बॅनरबाजी
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षावरून भाजप आक्रमक. अमरावतीमध्ये भाजपाचं शक्ती प्रदर्शन. उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी दे भगवान…. अमरावती मध्ये बॅनर. राम रक्षा पुस्तकात पाहून तरी नीट वाचता येईल का? उद्धव को सन्मती सद्गुती दे भगवान. श्री रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या हिंदुत्व सोडणाऱ्या शिवसेना प्रमुखांचा विचार सोडणाऱ्या उद्धवजींना सद्बुद्धी दे रे देवा असे बॅनर.
-
सुनेत्रा वहिनींना अर्थ खाते देऊन दादांना वाढदिवसाची भेट द्या
अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असल्याने, वाढदिवसानिमित्त सुनेत्रा वहिनींना अर्थ खाते देऊन दादांना वाढदिवसाची भेट द्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी केली. राष्ट्रवादीच्या वाट्याचे अर्थ खाते सुनेत्रा वहिनींना दिल्यास यापेक्षा मोठी भेट असू शकत नाही असं ते म्हणाले.
-
भारताच्या अवकाश क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण, पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च
भारतीय अवकाश इतिहासात एक नवीन अध्याय सुरु झाला आहे. हैदराबादच्या स्कायरुट एअरोस्पेसने शनिवारी भारताचं पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 लॉन्च केलं. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून हे लॉन्चिंग झालं.
-
वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागातर्फे दुचाकीस्वार आरोग्यदूत तैनात
माऊलींच्या पालखी मार्गावर, वारकऱ्यांना जलद उपचार मिळावेत यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे दुचाकीस्वार आरोग्यदुत तैनात. पालखीच्या वाटेवर सिरीयस होणाऱ्या रुग्णांना तसेच आजारी वारकऱ्यांना जलद सुविधा मिळावी यासाठी प्रशासनाकडून आरोग्यदुत मार्फत सेवा पुरवण्यात येत आहे. पालखीचा मुक्काम असलेल्या बरड गावाच्या परिसरात आरोग्यदुतांच्या 24 टीम तैनात असून, एकूण 48 आरोग्य दुतांमार्फत सुविधा पुरवण्यात येतीय. वारकऱ्यांच्या गर्दीतून चार चाकी ॲम्बुलन्स त्वरित रुग्णापर्यंत पोहोचवणं शक्य नसल्याने, वैद्यकीय अधिकारी दिपक कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यदुतांच्या या बाईक द्वारे रुग्णांपर्यंत जलद उपचार पोहोचावेत यासाठी प्रशासनाकडून सेवा पुरवण्यात येत आहे.
-
संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे सिद्धरामेश्वरांच्या नगरीत दाखल
संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापौर विनायक कोंड्याल आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सपत्नीक पालखीचे स्वागत केले. माझ्यासाठी आज भाग्याचा दिवस आहे की मला महापौर म्हणून पालखीचे स्वागत करण्याची संधी मिळाली. महापालिकेतर्फे पालखीतील वारकऱ्यांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फिरता दवाखाना फिरते शौचालय तसेच रुग्णवाहिका यांची व्यवस्था केली आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्तबधत्तेबद्दल ऐकले होते मात्र आज प्रत्यक्षात सोलापूरचे प्रथम नागरिक म्हणून आम्ही पालखीचे दर्शन घेतले.
-
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दोन हजार विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वेरी कॉलेजच्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट आणि प्रदक्षिणा मार्गावर दोन दिवस स्वच्छता मोहीम राबवली. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सुमारे दोन टन कचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ वातावरण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम दोन दिवस राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे भाविक आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.
-
पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या
चाकण येथील बडीमा रफिक पठाण या २७ वर्षीय महिलेची तिच्याच पतीने हत्या केल्याचा आरोप आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. वादाच्या भरात आरोपी रफिक पठाण याने घरातील मिक्सरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तो थेट चाकण उत्तर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
-
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर फाटाजवळ भीषण अपघात
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर फाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने इनोव्हा कारला चिरडले आहे. अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. इनोव्हा कार मध्ये ७ प्रवासी होते, नाशिक शहरातील सिडको येथील कुटूंबातील परिवार काळाचा घाला. कुटूंबातील सात तरुण अजमेर येथे फिरण्यासाठी गेले असतांनाच अपघात झाला. घटनास्थळी वाहतूक पोलीसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
-
भोंदू खरातच्या विरोधात ईडीकडून आरोपत्र
भोंदू अशोक खरातविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. त्याच्या विरोधात जवळपास ३ हजारहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
-
पुण्यातील आंबेगावात सह दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला मारहाण
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक दत्तनगर येथील हवेली येथे शुक्रवारी सह दुय्यम निबंधक अधिकारी आणि वकीलात दस्त नोंदणी विषयावरून शाब्दिक वाद झाले. त्यानंतर या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झालं. या हाणामारीनंतर सहदुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र नामदेव कोळी व कर्मचारी यांनी आंबेगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली आहे.
-
राज्यात ठाकरे-राणा आमनेसामने; रवी राणा हनुमान गडीवर करणार हनुमान चालीसा पठण
राज्यात ठाकरे-राणा आमनेसामने आले आहेत. एकीकडे नागपुरात रामरक्षा आंदोलन हाती घेतलं आहे. तर अमरावतीत हनुमान गडीवर नवनीत राणा करणार हनुमान चालीसा पठण करणार आहेत. या दोन्ही आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
-
संजय राऊत यांची नागपुरात रामरक्षा आंदोस्थळाची पाहणी
संजय राऊत यांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनस्थळी पाहणी केली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 4 वाजता रामरक्षा आंदोलनात पठण केले जाणार आहे. या आंदोलनासाठी ठाकरे गटाने विविध संघटनांना आमंत्रण दिलं आहे.
-
फलटणची पूजा होताच संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बरडकडे प्रस्थान
पुण्यातील फलटण येथील पहाटेची पूजा विधीवत संपन्न झाली. त्यानंतर आता संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी बरडकडे प्रस्थान झालाय. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात वारकरी भक्तिभावाने माऊलींसोबत मार्गस्थ झालेत.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपूर दौऱ्यावर
आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. पंढरपुरातील आषाढी एकादशी निमित्त उभारण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री शिंदे करणार आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अशाच प्रकारे आषाढीपूर्व आढावा दौरा केला होता. मात्र आता उपमुख्यमंत्री असतानाही ते आढावा दौरा करत आहेत
-
भावली धरण पर्यटक मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट
पर्यटक आणि आरोपी यांच्यातील वादाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पीडित महिलेकडूनच मारहाण केली जात असल्याचा आरोप होतो आहे. इथूनच वादाला सुरवात झाली होती. आठ दिवसांपूर्वी महिलेची छेड काढून नाशिकच्या कुटूंबावर गावगुंडानी हल्ला केला होता. आतापर्यंत 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
-
अन्न व औषध प्रशासनाचा धसका, दूध ओतले ओढ्यात
सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी येथे ओढापत्रामध्ये पाण्यात दूध ओतण्यात आल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. ओढ्यात ओतण्यात आलेले दूध भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त दूध व अन्न भेसळी विरोधात जोरदार कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कारवाईच्या भीतीने ओढ्यात दूध ओतून देण्याचे कृत्य करण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ओढ्याच्या पत्रामध्ये दूध ओतल्याने ओढ्यातील पाणी पांढरे दिसू लागले होते.
-
नाशिककरांना मोठा दिलासा
नाशिक मधील दर शनिवारी होणारी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. १७ जून पासून शहरात दर शनिवारी पाणीकपात लागू होणार होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ७१ टक्के तर मुकणे धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे १८ जुलै पासून शहरातील दर शनिवारचा पाणीकपात रद्द करण्याची घोषणा महापौर हिंमगौरी आहेर आडके यांनी केली आहे
-
मातोश्रीसमोर सोनम वांगचूक यांना पाठिंबा देणारे बॅनर
मुंबईच्या मातोश्री समोर शिवसेना ठाकरे पक्षाकडून उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांना पाठिंबा देणारे बॅनर चर्चेत आले आहे. सर्व तरुणांना 19 जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. चला शिवतीर्थावर, सरकारच्या हुकुमशाही विरोधात लढा देणाऱ्या सोनम वांगचूक आणि भारतातल्या सर्व तरुणांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येऊयात आणि सरकारला जाब विचारण्यात असा या बॅनरवर आशय आहे.
-
केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे – शरद पवार
नीटमुळे हजारो शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. पण केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. वांगचुक यांना आज पहाटे सरकारने अटक केली तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
-
पोलिसांनी मारहाण केली- अभिजीत दिपके
पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केला आहे. पोलिसांनी सकाळीच काहीही सूचना न देता वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवले. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी शिवीगाळ केल्याचा आरोपही दिपके यांनी केला.
-
उपोषण स्थळ लवकर खाली करा -दिल्ली पोलीस
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांना आज उचलून नेलं. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने उपोषण स्थळ सोडण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
Published On - Jul 18,2026 8:58 AM
