Weather update : आता महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट, 17 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका, आपात्कालीन नंबर जारी
महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, राज्यात पावासाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, सात जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान आता या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून 17 जिल्ह्यांसाठी आपात्कालीन नंबर जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. दरम्यान चिंतेची बाब म्हणजे पुढील 24 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. आयएमडीकडून राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट तर उर्वरीत सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील 48 तास राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे, आज हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, जालना, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत सर्व जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे.
दरम्यान आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेला मुसळधार पाऊस असाच सुरू राहिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता, 17 जिल्ह्यांसाठी आपात्कालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
01. बीड – 02442-299299 02. लातूर – 02382-220204 03. धाराशिव – 02472-227301 04. नांदेड – 02462-235077 05. परभणी – 02452-226400 06. सोलापूर – 0217-2731012 07. पुणे – 09370960061 08. सातारा – 02162-232349 09. अहिल्यानगर – 0241-2323844 10. गडचिरोली – 07132-222031 11. कोल्हापूर – 02312-659232 12. रायगड – 08275152363 13. रत्नागिरी – 0705722233 14. सिंधुदुर्ग – 02362-228847 15. पालघर – 02525-297474 16. ठाणे – 09372338827 17. मुंबई शहर व उपनगर – 1916/022-69403344
यासोबतच मंत्रालयातील 24/7 कार्यकेंद्र क्रमांक 01. 022-22027990 02. 022-22794229 03. 022-22023039 04. 09321587143 आपात्कालीन परिस्थितीत वरील क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.
घराबाहेर न पडण्याचं आवाहान
दरम्यान पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जर पाऊस असाच राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच थांबा असं आवाहनही शासनच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असून, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. याचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. शासनाकडून युद्धपातळीवर मदत सुरू करण्यात आली आहे.
