अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?
Chhagan Bhujbal Big Statements: अजितदादांची आज जयंती आहे. शासकीय कार्यालयं, निमशासकीय कार्यालयं, शाळांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा त्यांना आदरांजली वाहिली. त्याचवेळी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

Chhagan Bhujbal on Ajit Pawar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक एक्झिटने अनेकांना धक्का बसला. मंत्री छगन भुजबळ यांनी यानिमित्ताने दादांसोबतच्या जुन्या आठवणी जागवल्या. दादांच्या बेधडक स्वभावाची आठवण करत त्यांनी त्यांनी आदरांजली वाहिली. त्याचवेळी बोलताना त्यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी पक्षातील काहींना टोला लगावल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षात नाराज असल्याचे सांगितले जात असताना भुजबळांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.
दादांच्या आठवणीत छगन भुजबळ भावुक
मागच्या वेळी वाढदिवस साजरा केला, यावेळी जयंती होत आहे, हे अतिशय दुःखद आहे, असे सांगताना मंत्री छगन भुजबळ भावुक झाले. अजित पवार यांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. सहकार, शिक्षण आणि महिलांसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. सकाळी ६ वाजताच कामासाठी बाहेर पडणारे ते नेते होते. दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. लाडकी बहीण योजनेसाठी निधीची तरतूदही अजित दादा करत होते. आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या रूपात आपण अजित दादांना पाहूयात. अजित दादांची आठवण कायम राहील, मात्र पुढे जाऊन काम करावे लागेल. आज देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस असून त्यांनाही शुभेच्छा, असे भुजबळ म्हणाले.
अनेकांना वाटत होते की…
अनेकांना वाटत होते जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र पक्षाने तसे होऊ दिले नाही, असा टोला यावेळी भुजबळांनी लगावला. त्यांचा रोख कुणाकडे होता याची जोरदार चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांनीही चांगली प्रगती केली आहे. महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना ताकद दिली पाहिजे, असे मोठे वक्तव्य भुजबळांनी केले आहे.
दिल्लीतील आंदोलनावर चिंता
दिल्लीत घडलेल्या घटना यातनादायी आहेत. त्या टाळता आल्या असत्या तर बरे झाले असते, असे भुजबळ म्हणाले. काही आंदोलक आक्रमक झाले होते. दिल्लीतील वरिष्ठ नेते या प्रश्नात लक्ष घालून तो सोडवतील. विरोधकांचे कामच संधी मिळाली की मुद्दा वाढवण्याचे असते. जे घडले ते सर्वांसमोर आहे; अशा घटना टाळता आल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते, असे मत भुजबळांनी व्यक्त केले.
सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात
दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी आमच्या कार्यकर्त्यांबरोबरच उभ्या महाराष्ट्राची इच्छा होती मात्र काही ना काही कारणास्तव ते 2004 मध्ये मुख्यमंत्री होऊ शकले नाही. दादा जर मुख्यमंत्री राहिले असते तर या राज्याची आणि शेतकर्यांची दिशा ही अतिशय वेगळी राहिलेली असती.. राज्याच्या विकासाचा गाडा आणि जबाबदारी ही सुनेत्राताई वहिनी यांनी स्वीकारली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत दादांच्या जागी आता सुनेत्रा वहिनी यांनीच या पहिल्या मुख्यमंत्री व्हावे, ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे वक्तव्य आमदार अनिल पाटील यांनी केले.
पण मुख्यमंत्री होण्यासाठी आमदारांचा बहुमताचा आकडा गाठावा लागतो, मात्र महाराष्ट्रातील जनता एक न एक दिवस सुनेत्रा वहिनी यांना मुख्यमंत्री म्हणून बघतील आणि आमचे प्रयत्न तसे राहतील. दादांची इच्छा अपूर्ण राहिली असली तरी सुनेत्राताई यांच्या पाठीशी संपूर्ण कार्यकर्ते खंबीरपणे उभे असून एक ना एक दिवस आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू या शब्दात आमदार अनिलपाटील यांनी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हाव अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर दोन्हीकडच्या नेत्यांकडून पूर्णविराम देण्यात आला असल्याचे देखील आमदार अनिल पाटील म्हणाले.
