Rohit Pawar: विमान अपघाताप्रकरणी पुन्हा पुरावा बॉम्ब! रोहित पवारांचा तो सर्वात मोठा आरोप काय?
Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या धक्क्यातून अजूनही अनेक जण सावरलेले नाहीत. अनेकांना हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आहे. त्यात रोहित पवार हे आघाडीवर आहेत. त्यांनी आता अजून एक मोठी घोषणा केली आहे. त्याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे.

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताने अनेकांना धक्का बसला. काहींना अजूनही दादा आपल्यात नाहीत हा विचारही पटत नाही. तर दादांचा विमान अपघात हा घातपात असल्याचे अनेकांना वाटते. त्यात आमदार रोहित पवार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी आतापर्यंत चार पत्रकार परिषद घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले. त्यांनी अपघाताप्रकरणी सादरीकरण करत काही प्रश्नही उपस्थित केले. तर याप्रकरणी तपास यंत्रणांच्या संथ तपासावर ताशेरेही ओढले. रोहित पवार हे मध्यंतरी दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यापासून तर अनेक विरोधी गोटातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. सरकारवर दबाव टाकण्याची आग्रही भूमिका मांडली. त्याचवेळी आता ते अजून एक पुरावा सादर करणार आहेत. त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
रोहित पवारांची अजून एक पत्रकार परिषद
विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार हे पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. ही या संदर्भातील अखेरची पत्रकार परिषद असण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेतून सर्व महत्त्वाचे पुरावे लोकांसमोर आणणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. विमान अपघाता संदर्भात एफआयआर दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हा दाखल होणे आवश्यक असते असे ते म्हणाले. तर अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात राज्यातील विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा होऊ दिली जात नसल्याचा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला.
जय पवार यांची पत्रकार परिषद?
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल व्हायला हवा पण तो झाला नाही. जय पवार हे सुद्धा ट्विट करतात, त्यामुळे ते पत्रकार परिषद घेतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. आम्ही दादांच्या मृत्यूचं कधीच राजकारण केलं नाही, एवढा मोठा नेता आपल्यातून कायमचा हरपून जातो , पण ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला याबाबत तपास योग्य पद्धतीने व्हावा असं वाटतं. त्यामुळे राजकारण आम्ही करतोय का ते करतात याचा विचार त्यांनी करावा. त्यांचं हे बोलणं हास्यास्पद आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, सरकारला याबाबत कोणतंच गांभिर्य नाही, कायदा सुरक्षा नावाला शिल्लक राहीला नाहीये असा आरोपही रोहित पवार यांनी केला.
