Rohit Pawar: अजितदादांचा विमान अपघात की घातपात? सोमवारी रोहित पवारांचा पुन्हा मोठा बॉम्ब, ट्विट करून काय दिली माहिती?
Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांचा विमान अपघात होता की तो घातपात होता यावरून गेल्या एक महिन्यापासून वातावरण तापले आहे. आमदार रोहित पवार हे मोठा दावा करत आहेत. तीन पत्रकार परिषदेतून त्यांनी पुरावे सादर करून हा घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. आता ते अजून एक बॉम्ब टाकणार आहेत.

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अकाली एक्झिटने महाराष्ट्र हळहळला आहे. दादांच्या निधनाला उद्या एक महिना पूर्ण होईल. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाला अपघात झाला होता. हा विमान अपघात होता की तो घातपात होता यावरून संशयकल्लोळ उठला आहे. आमदार रोहित पवार यांनी तीन पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले. त्या आधारे त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहे. या पुराव्यावरून त्यांनी हा घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. तर दोन दिवसांपासून ते DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची आग्रही भूमिका मांडताना दिसत आहेत. दरम्यान त्यांनी येत्या सोमवारी, 2 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन अजून एक बॉम्ब टाकणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रोहित पवार यांचे ट्वीट काय?
“अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत असून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या AAIB चा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहोत, त्यामुळे भूतकाळातील इतर घटनांप्रमाणे थातुरमातूर अहवाल देण्याचा प्रयत्न AAIB नक्कीच करणार नाही, ही अपेक्षा!” असे ट्वीट करत रोहित पवार यांनी सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे सोमवारी ते याप्रकरणात आता काय खुलासा करणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत असून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या AAIB चा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 27, 2026
रोहित पवार आक्रमक
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून रोहित पवार हे DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही आणि आक्रमक दिसले. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी भूमिका मांडली. पण पोलिसांशी त्यांचा वाद झाला. पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. तर काल ते बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी अजितदादांचे बंधू आणि पुतणे हे पण उपस्थित होते. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.यावेळीही पोलिसांशी त्यांची हुज्जत झाली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी वेळ मागितल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तर रोहित पवार यांच्या या भूमिकेवर भाजपमधून टीका होत असल्याचे दिसते. काहींनी रोहित पवार हे गुन्हा नोंदवण्यासाठी आग्रही नाही तर स्टंट करत असल्याचे म्हटले आहे. तर रोहित पवार यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही टीका केली आहे. उद्या AAIB चा प्राथमिक अहवाल येण्याची शक्यता आहे. त्याविषयी रोहित पवार काय भूमिका घेतात हे उद्या कळेल. तर आज रोहित पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहचले आहेत. ते शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले आहेत. अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्दावर ते बोलणार असल्याचे समजते.
