मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
खासदार संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊतांच्या दाव्यानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देशाच्या नेतृत्त्व बदलावर गंभीर चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदींना 'लादले' जात असून, अमित शाह पंतप्रधान होऊ शकत नाहीत. शिवाय, शाहंसोबत काम करण्यास कुणीही तयार नसल्याचा दावाही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची सत्तेतून जाण्याची वेळ आली आहे. केंद्रातील नेतृत्त्व बदलाची संघात जोरदार चर्चा सुरू आहे. माझ्याकडे याबाबतची पक्की माहिती आहे, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. राऊत यांच्या या दाव्यावर आता भाजपमधून काय प्रतिक्रिया येते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबरदस्तीने लादलं जात आहे. भाजपकडे दुसरा कोणताही चेहरा नाही. जे चेहरे आहेत ते विद्रूप आहेत. अमित शाह यांना कोणीच पंतप्रधान करणार नाही. अमित शाह यांची किती इच्छा असली, त्यांनी किती कारस्थानं केली. किती पक्ष फोडले, खासदार फोडले तरी शाहांना भाजप देशाचे पंतप्रधान करणार नाही. मोदींना चालवलं जात आहे, असं सांगतानाच संघात देशाच्या नेतृत्वाच्या बदलाबाबत चर्चा सुरू आहे. त्याबाबतची माझी माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.
संसदेत बहुमत असेल तर…
संघाचे अजेंडे पूर्ण करण्यासाठी मोदीच हवेत असं नाही. एखाद्या पक्षाचं बहुमत संसदेत असेल तर त्या बहुमताच्या जोरावर तो पक्ष अजेंडा पूर्ण करू शकतो. मोदींच्या ठिकाणी अरुण जेटली किंवा गडकरी असते तरी बहुमताच्या जोरावर अजेंडे पूर्ण केले असते, असं सांगतनाच अमित शाह कुणाच्याही गुड बुक्समध्ये नाही. अमित शाह हे मोदींच्याही गुड बुक्समध्ये नाहीत, असं राऊत यांनी सांगितलं.
ही फडणवीस यांची सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या संसदीय समितीत स्थान मिळण्याच्या चर्चा आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी आधीच सांगितलं त्यांना केंद्रात जावं लागेल. त्यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीची आणि त्याचबरोबर फडणवीस यांना केंद्राची जबाबदारी घ्यावी लागेल. ही केंद्रात जाण्याची सुरुवात आहे. दिल्लीत त्याचसाठी फडणवीस यांच्या वाऱ्या वाढल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
मोदीही शाहांसोबत काम करायला तयार नाही
अमित शाह यांच्यासोबत कोणताही कार्यक्षम मंत्री काम करायला तयार नाही. हे मोदींना माहीत आहे. माझ्याकडे याची पक्की माहिती आहे. अमित शाहांसोबत फडणवीसही दिल्लीत काम करायला तयार नाहीत. भाजपच्या इतर नेत्यांनीही शाहांसोबत काम करायला नकार दिला आहे. अमित शाह यांच्यासोबत काम करायला मोदीही तयार नाहीत. त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याची मोदींची मानसिकता नाही. देशात जे दुषित वातावरण झालंय त्याला शाह जबाबदार आहेत. या सर्व गोष्टी शाह यांनी आणल्या, मोदींची मात्र फरफट झाली, असा दावाही त्यांनी केला.
