ऑपरेशन टायगरचा फियास्को? गेम पालटणार? शिंदेसाठी ती बिकट वाट कोणती? वाचा इनसाईड स्टोरी
Operation Tiger Shivsena Udhhav Thackeray Eknath Shinde: ऑपरेशन टायगरची चर्चा जोर धरत असताना उद्धव सेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या दाव्यानुसार 2022 प्रमाणे पक्षाला खिंडार पाडणे तितके सोपे नाही.

Operation Tiger Shivsena: राज्याच्या राजकारणात क्षणोक्षणी बड्या घडामोडी घडत आहेत. उद्धव सेनेच्या सहा खासदारांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. पण उद्धव गटाच्या दाव्यानुसार, 2022 प्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे सेनेला खिंडार पाडणे सोपे नाही. कारण या सहा ही खासदारांनी अजून उद्धव ठाकरे अथवा आदित्य ठाकरे यांच्यावर कोणतीही टीका केलेली नाही. केवळ ओमराजे निंबाळकर हे समोर आलेले आहेत. ते माध्यमांशी थेट बोलत आहेत. ते उद्या, सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे ऑपरेशन टायगरमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचे मानले जात आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी वाट तितकी सोपी नसल्याचे मानले जात आहे.
पहिला मुहूर्त हुकला?
रविवारी उद्धव सेनेची बैठक झाली. त्यात चार खासदार प्रत्यक्ष तर पाच खासदार ऑनलाईन उपस्थित राहिले. त्यानंतर लागलीच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. सहा खासदारांनी बंड केल्याचे आणि स्वतंत्र गट स्थापन्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अर्ज केल्याची वार्ता आली. त्यानंतर 19 जून रोजीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बंडखोर खासदार हे शिंदे सेनेच्या मंचावर असतील असा दावा झाला. पण हा मुहूर्त हुकला.
खासदारांची उद्धव ठाकरेंवर नाही टीका
संजय दिना पाटील
संजय जाधव
संजय देशमुख
भाऊसाहेब वाकचौरे
नागेश पाटील आष्टीकर
ओमराजे निंबाळकर
या सहा खासदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्याचा दावा आहे. पण ओमराजे निंबाळकर वगळता एकही खासदार अद्याप माध्यमांसमोर आलेला नाही. कोणीही मोठी प्रतिक्रिया दिलेली नाही. तर या खासदारांनी अजून उद्धव ठाकरे अथवा आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाही. ओमराजे निंबाळकरांनी तर उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपण कोणतीही टिप्पणी केली नसल्याचे म्हटले आहे.
ओमराजे निंबाळकर उद्या मातोश्रीवर
ओमराजे निंबाळकर हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. तिथे ते स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार यांच्याशी चर्चा करतील. काल रात्री त्यांचे मित्र कैलास पाटील आणि आमदार वरूण सरदेसाई यांनी त्यांची समजूत काढण्याचा, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतो आणि वैयक्तिक बाजू मांडतो असे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेना काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा नाकारल्या
खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून फुटून जे प्रादेशिक पक्ष तयार झाले आहेत. त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे आवाहन केले होते. याच वक्तव्याचा वापर काही जणांनी केला आणि त्यामुळे उद्धव सेनेत उभी फूट पडल्याचा दावा करण्यात आला. काल झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे फुटीसाठी ठोस मुद्दा हाती लागत नसल्याने बंडखोरांची मोठी फसगत होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
विकास कामे, विकास निधी हे गुळगुळीत शब्द झाले आहेत. विरोधात बसावे लागेल हे लोकसभा निवडणुकीवेळी या सर्व बंडखोरांना माहिती होते. मग दोन वर्षांना त्यांना विकास कसा आठवला असा ऐरणीचा मुद्दा संजय राऊत यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे बंडखोरांची मोठी कोंडी झाली आहे. मतदारसंघातही मोठा विरोध सुरू आहे. त्यामुळेच ही फूट वाटते तुतकी सोपी नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
