Sanjay Raut: सरकारला जी भाषा कळते… मुंबईतील मराठा मोर्चापूर्वी संजय राऊत यांनी तोफ डागली, बापटांच्या जीवाला धोका? गंभीर आरोप काय?
Sanjay Raut on Manoj Jarange, Vidyanand Bapat: मनोज जरांगे 19 सप्टेंबर रोजी मुंबईत धडकणार आहेत. आझाद मैदानावर ते आंदोलन करणार आहेत. आंदोलन, भाषेवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर मोठा निशाणा साधला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेवरून सध्या महायुतीतील मंत्री, सरकारच्या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. जरांगे यांच्या मागण्यांऐवजी सरकार दरबारी केवळ त्यांच्या गावरान भाषेवर मंथन केल्या जात आहे. हाच मुद्दा पकडत आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर खरमरीत टीका केली. त्यांनी विद्यानंद बापट यांचे उदाहरण पुढं करत सरकारला सुसंस्कृत भाषा कळते का? असा रोकडा सवाल केला.
मग बापटांच्या मागण्या मान्य का नाही?
मला आश्चर्य वाटतं त्यांच्याशी सरकार चर्चा करत नाही. पहिलं कारण असं सांगितलं जातंय की त्यांची भाषा चांगली नाही. ते थोडी शिवराळ भाषा वापरतात. त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करता येत नाही असं सरकारचं, मंत्र्यांचं म्हणणं आहे. ही गोष्ट मान्य आहे. हेच जर कारण असेल तर पुण्यात एक विद्यानंद बापट आहेत. ते अत्यंत सभ्य आणि संस्कारी भाषेत त्यांचे आंदोलन करत आहेत. त्यांचा मराठी भाषेचा आदर्श आहेत. पण चांगली भाषा वापरली म्हणून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यात का? असा रोकडा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.
सरकारला जी भाषा कळते ती वापरा
उलट सभ्य, संस्कारी, सुसंस्कृत भाषा वापरली म्हणून त्यांच्यावर सरकार पुरस्कृत गुंडांनी हल्ला चढवला. त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना धमक्या येत आहे. परवाच्या मोर्चांना त्यांना बाहेर पडू दिले नाही असा आरोप राऊतांनी केला. मग जरांगे पाटील यांनी अशी भाषा वापरली म्हणून सरकारचा जळपळाट व्हायचे कारण नाही असा टोला राऊतांनी हाणला. विद्यानंद बापट यांच्या संस्कारी भाषेतील मागण्या तुम्ही मान्य करा. त्यामुळे मागण्या मान्य करताना भाषा हा मुद्दा होऊ शकत नाही, असे राऊत म्हणाले. सरकारला जी भाषा कळते ती वापरावी असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे. सरकारला जर शिवीची भाषा कळत असेल तर ती भाषा वापरायला हरकत नाही, असे राऊत म्हणाले. सरकारमध्ये अर्धे लोक हे गुंड आणि भ्रष्टाचारी आहेत. त्यांना कोणती भाषा कळणार हे मला जरा सांगा, असा सवाल राऊतांनी केला.
अमित शाहांच्या दौऱ्यावरून टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जेव्हा मुंबई दौऱ्यावर असतात. तेव्हा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा ताण हा मोठ्या प्रमाणावर मुंबई पोलिसांवर पडतो. त्याचा दुष्परिणाम मुंबईतील जनतेला भोगावा लागतो. सद्या गणेशोत्सव आहे. गणपती मूर्ती खरेदीसाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर आहेत. पण गृहमंत्री आल्याने मुंबईचा अर्धा पोलिस फोर्स हा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात झाला आहे. सुरक्षेच्या नावाखाली रस्ते बंद केले जातात. त्याचा भुर्दंड हा सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो, अशी टीका राऊत यांनी केली.
गृहमंत्र्यांचे कार्यक्षेत्र हे दिल्ली आहे. दिल्लीत त्यांचा वेळ जात नसेल. अथवा जेन झीची भीती वाटत असेल तर त्यांनी मणिपूरला गेले पाहिजे. मणिपूरला बऱ्याच दिवसांपासून देशाच्या गृहमंत्र्याची आवश्यकता आहे. त्यांनी आसामला गेले पाहिजे. बंगालमध्ये गेले पाहिजे. या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था गंभीर झालेली आहे. मुंबईमध्ये त्यांना पैशांचे थैल्या देणारे लोक आहेत. ते यासाठी मुंबईत येतात, असा आरोप राऊतांनी केला. बिल्डर, जमिनीचे व्यवहार करणारे लोकं, त्यांच्या जीवावर भाजप तरारलेली दिसेल. मुंबई महापालिकेतून मोठ्या प्रमाणात फंड कलेक्शन करण्यात येते. अमित शाह हे एकेकाळी शेअर बाजारात काम करत होते. देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी इथं येणं कमी करायला हवे. मुंबई हे गजबजलेले शहर आहे. येथील प्रशासनासह जनतेवर ताण येतो. तुम्ही एकटे या, तुमची गॅरंटी मुंबईकर घेईल. लाल बागच्या राज्याच्या दर्शन घेतील. चिंतामणीचं दर्शन घेतील. गौतम अदानी यांनी ते घेतलेले आहेत. त्यामुळे उद्योगपतींच्या गणपतीला त्यांना जावेच लागेल, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
