प्रताप सरनाईकांचा निर्णय फिरवला, मराठी भाषेसंदर्भातील फडणवीसांच्या निर्णयावरून महायुतीत धुसफूस? घडलं काय?

Devendra Fadnavis -Eknath Shinde Marathi : अमराठी ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली. पण या निर्णयावरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात आहे.

प्रताप सरनाईकांचा निर्णय फिरवला, मराठी भाषेसंदर्भातील फडणवीसांच्या निर्णयावरून महायुतीत धुसफूस? घडलं काय?
मराठी भाषा, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 8:29 AM

मुंबईत अमराठी भाषिकांनी मराठी भाषा बोलावी यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कडक भूमिका घेतली. त्यांनी दोन महिन्यांची मुदत आणि भाषा शिकण्यासाठी प्रशिक्षणाची सोय करून दिली. अमराठी चालकांना आता मुदतवाढ न देण्याची भूमिका त्यांनी रेटली. त्यानंतर काही अमराठी रिक्षा चालकांनी आडमुठी भूमिका घेतली. त्यावरून मोठी तेढ निर्माण झाली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्यांनी प्रताप सरनाईक यांचा निर्णय फिरवला. यावरून आता महायुतीत धुसफूस सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

महायुतीमधील मंत्री नाराज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर महायुतीमधील मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. उत्तर भारतीयांना दिलासा मात्र मराठी भाषेला दुजाभाव का? असा सवाल शिंदे सेनेतील मंत्री विचारत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲाटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जूजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची दिलेली मुदतवाढ वादात सापडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकतर्फी निर्णय घेणार असतील तर मग कॅबिनेट बैठक कश्यासाठी घेतात? असा नाराजीचा सूर मंत्र्यांनी आवळला आहे. त्यांनी याविषयी एकनाथ शिंदे यांच्याकडेही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. केवळ एकाच निर्णयाने नाही तर काही ठिकाणी अनाकलनीय हस्तक्षेपामुळेही अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे.

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आता राजकारण पेटणार

गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्र्यांनी महायुती मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय पक्षपातीपणे घेतले होते या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक मंत्र्यांचा नाराजी उफाळून आली आहे. राज्य मंत्री मंडळातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील नाराजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलीय. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसांची मात्र नाराजी ओढवून घेतली, असे म्हटले जात आहे.

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आता राजकारण पेटणार. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उत्तर भारतीयांच्या हिताचे निर्णय का घेतात…?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या मंत्र्यांची कशी समजूत काढणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिसूचना काढून मंत्री मंडळाचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतल्यामुळेही महायुतीचे मंत्री नाराज असल्याची वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली. आता अमराठी भाषिकावरून मंत्रीच नाराज झाल्याने त्यांची समजूत काढण्याचे मोठे आवाहन सरकारमधील वरिष्ठ नेत्यांसमोर आहे.

Follow Us