Manoj Jarange: अंतरवालीत निर्णायक आंदोलन, सरकारचे शर्थीचे प्रयत्न, मनोज जरांगेंच्या मनधरणीला यश येणार?
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन सुरू होत आहे. त्यापूर्वी त्यांनी सरकारला त्रुटी दूर करण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. जरांगेंशी बोलणी सुरू असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आंदोलनाची हाक दिली आहे. तीन दिवसांपूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण तोडगा निघाला नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत, आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. 28 ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्याचे आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते. आज सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंतरवाली सराटीत आंदोलनाची तयारी
अंतरवाली सराटीत उपोषणाची तयारी सुरू झाली आहे. मंडप टाकण्याची तयारी सुरू आहे. जरांगे पाटील सरकारशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. उद्या जरांगे पाटील उपोषणाला सुरूवात करणार आहेत. त्यासाठी आता कमी कालावधी उरला आहे. सरकारकडून चर्चेची दारं खुली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिष्टमंडळाने यापूर्वीच अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपातील दिरंगाबाबत दोषी धरले आहे. पण पुढच्या प्रक्रियेविषयी चर्चेत तोडगा न निघाल्याने वाद कायम आहे. आता सरकार काय पावलं टाकतं याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारने दादागिरी करू नये
आझाद मैदानावर सायंकाळी सहानंतर आंदोलन करता येणार नसल्याने आंदोलकांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. सरकारने दादागिरी करू नये. नाहीतर विमान सेवा, रेल्वेसेवा बंद करू. सर्वच दिशेने मराठे मुंबईत घुसतील. टप्प्याटप्प्याने मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे अंतरवाली सराटीतील आंदोलन मुंबईत घेऊन जाण्याचाच इशारा त्यांनी दिला आहे.
जरांगेंशी आमची चर्चा सुरु
दरम्यान जरांगे पाटील यांच्याशी आमची चर्चा सुरू असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही असे आंदोलनाच्या अवघ्या काही तास अगोदर त्यांनी दावा केला. ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार नाही याची काळजी घेत असल्याचे ते म्हणाले. विखे पाटील, आपण, आमदार लाड हे जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
