Onion Farmer Agitation: गळ्यात कांद्याची माळ, सरकारविरोधात एल्गार… रोहित पवारांचा मोठा इशारा काय?
Rohit Pawar in Onion Farmer Agitation: राज्यात डबल इंजिन सरकार असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय वेळेवर घेतले जात नसल्याची खंत व्यक्त करत अशावेळी शेतकऱ्यांनी काय करायला हवे असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला. मंचर येथे आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मविआ रस्त्यावर उतरली.

Rohit Pawar in Onion Farmer Agitation: मंचर येथे कांदा उत्पदा शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजही जोरदार आंदोलन केले. गेल्यावेळी सुद्धा नेत्यांसह शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. दिल्लीत त्यानंतर खलबतं झाली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय झाले. राज्यात डबल इंजिन सरकार असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय वेळेवर घेतले जात नसल्याची खंत व्यक्त करत अशावेळी शेतकऱ्यांनी काय करायला हवे असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला. मंचर येथे त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे , खासदार निलेश लंके , बापू पठारे यांनी रास्तारोको केला.
रोहित पवार यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
रोहित पवार यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस आले आहेत. पोलिसांकडून रोहित पवार यांना आंदोलन सभेची परवानगी आहे रस्ता रोको करू नका अशी विनंती करण्यात आली. पण रोहित पवार रस्ता रोको साठी ठाम आहेत. शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटांचे खासदार अमोल कोल्हे यांनी आंदोलनाला दांडी मारली. कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचविण्यासाठी मंचर येथे विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे पुणे नाशिक महामार्गा रोखण्यासाठी आंदोलक आणि नेते रस्त्यावर उतरले आहेत. तर आता रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
25 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न
आज सरकारने कॅबिनेटमध्ये सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 24 रुपये भाव देणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर कांदा दिला आहे. त्यांना दहा ते पंधरा रुपये अनुदान द्या. मार्केट कमिटीत दहा लाख टन कांदा घेणार अशी घोषणा केली, पण कांदा अद्यापही खरेदी केला जात नाही असा आरोप त्यांनी केला. सरकारला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलनावर आम्ही ठाम आहोत असे रोहित पवार म्हणाले. 25 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या निर्णयावर का दिरंगाई करता असा सवाल त्यांनी विचारला.
शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
मंचर येथे कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदोलनावेळी मनोगत व्यक्त करत असताना नगर येथील युवा शेतकरी राहुल बहिरट यांनी व्यासपीठावरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र, व्यासपीठावरील कार्यकर्त्यांनी वेळीच सतर्कता दाखवत त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा हा उद्रेक मानला जात असून, या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे. ..
