Narpar Project : ‘नारपार’च्या लढाईतील चेहरे, 1982 पासून झटणारे प्रशांत हिरे, नारपार म्हणजे काय? वाचा A टू Z माहिती
महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणारा प्रकल्प म्हणजे नारपार प्रकल्प. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या पेठ आणि सुरगाणा या भागात सह्याद्री डोंगररांगांच्या परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिथे सहा मुख्य नद्यांचा उगम होतो. या नद्यांना अनेक उपनद्यादेखील आहेत. या नद्यांचं 100 टीएमसी पेक्षा जास्त पाणी दरवर्षी अरबी समुद्रात वाहून जातं. त्यामुळे या पाण्याचा वापर महाराष्ट्रासाठी केला तर त्याचा मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या चार दशकांपासून सातत्याने काम करणारे माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्याकडून आम्ही या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

महाराष्ट्रात सध्या नारपार नदीजोड प्रकल्पावरुन रान पेटताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रात नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी दररोज वेगवेगळ्या भागात आंदोलन होताना दिसत आहे. संसदेत खासदार भास्कर भगरे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी नारपार संबंधित विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देशाचे जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी संसदेत नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्प अव्यवहारी असल्याचं सांगत संबंधित प्रकल्प रद्द केल्याचं सांगितले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. सी. आर. पाटील यांच्या वक्तव्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात काही सामाजिक संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. ही आंदोलने पाहिल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत नवी माहिती दिली. नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्प रद्द झाला नसून राज्यपालांच्या स्वाक्षरीने मंजूर झाला असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील सभेत मोदींसमोर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं. ...
