रोहिणी खडसेंना हात पाय पकडून उचलले, रोहित पवार-आव्हाडही पोलिसांच्या ताब्यात, नवी मुंबईत काय घडलं?
NPC Protest : आज नवी मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलक नेत्यांना ताब्यात घेतलं होतं.

गेल्या काही काळापासून देशातील महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडलं आहे. एकीकडे महागाई आणि दुसरीकडे बेरोजगारी यामुळे संकट आणखी वाढले आहे. याच प्रश्नांबाबत आज नवी मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जेव्हा पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आले त्यावेळी मोठा राडा झाला. राष्ट्रवादीच्या अनेक आंदोलकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. यात रोहिणी खडसे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड या नेत्यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नवी मुंबईत राष्ट्रवादीचे आंदोलन
नवी मुंबईतील या आंदोलनात आंदोलकांनी चूल मांडून आणि भांडी वाजवून आंदोलन केले. सिडको एक्झिबिशन बाहेर पोलिसांचा मोर्चा अडवण्यात आल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यावेळी शाब्दिक चकमक आणि ढकलाढकली झाली. यावेळी सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. रोहिणी खडसे सक्षणा सलगर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. खडसे यांना पोलिसांनी उचलून नेलं.
आंदोलनाला परवानगी राहिलेली नाही- जयंत पाटील
या आंदोलनानंतर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आंदोलन करण्याची कुणाला परवानगी राहिलेली नाही. चालू नेत्यांना आंदोलनातून पकडून घेऊन जाणे अतिशय चुकीचं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. यामुळे सामाम्य जनता प्रचंड अस्वस्थ झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाबाबत म्हटले की, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड होणारा भ्रष्टाचार यामुळे देशाची आर्थिक स्थिती अडचणीत आली आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.
बेरोजगारी आणि महागाईने सामान्य माणसाचं जगणं कठीण झालं असून याबाबत झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवी मुंबईत प्रतिकात्मकरित्या रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं आणि सामान्य माणसाच्या दररोजच्या जगण्याच्या लढाईकडं… pic.twitter.com/TIJYz0Ji2H
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 3, 2026
काय म्हणाले रोहित पवार?
आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनाबाबत म्हटले की, झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आमचं आंदोलन आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे, कोणालाच व्यक्त होता येत नाही. शेतकऱ्यांनी दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. कर्जमाफीत अनेक कठोर अटी आहेत. 2018 च्या कर्जमाफीतही अनेक कठोर अटी होत्या. 33 लाख शेतकऱ्यानी 2018 ला कर्जमाफीचा लाभ घेतला होता. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना फक्त 50 हजारांचा लाभ होणार आहे. 3 लाख कर्ज असेल तर आधी 1 लाख भरा मग 2 लाख कर्जमाफी होणार आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.
