मोबाईल, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट आणि… रीलस्टार रोहिणीच्या मृत्यूचं कारण समजणार? पोलिसांनी चक्रे फिरवली
रील स्टार रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर तिचं हसतंमुख आयुष्य दिसलं तरी, 'दिसतं तसं नसतं' या म्हणीचा प्रत्यय तिच्या मृत्यूने आला. आभासी जगामागील खरं वास्तव काय होतं, हे शोधण्यासाठी पोलिस सखोल तपास करत आहेत, तिच्या चाहत्यांनाही या घटनेने धक्का बसला आहे.

दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं… सोशल मीडियाचा वापर वाढला आणि आभासी जगात लोकं जास्तच रमायला लागले. सोशल मीडियावरचे रीलस्टार जे दाखवतात, जे आयुष्य जगतात, ते त्यांच खरं आयुष्य आहे असं अनेकांना वाटतं. पण प्रत्यक्षात तसं असेलचं नाही. कॅमेऱ्यासमोर हसतमुखाने वावरणारी माणसं नेहमी खुशच असतात असं नाही, त्यांच्या हास्यामागे काहीतरी दडलेलं असू शकतं. इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स, शेकडो रील्स, मजेशीर व्हिडीओ , गावरान भाषेचा ठसका, ते बोलत लोकांचं मनोरंजन करणारी रीलस्टार म्हणून रोहिणी पाराध्ये आणि तिचा पती निलेश हे दोघे प्रसिद्ध होते.
सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गावात त्यांचं हॉटेल खूप गाजत होतं, पण तेच हॉटेल आता वेगळ्या कारणांनी चर्चेत आलं. त्याच हॉटेलमध्ये तिने आयुष्याचा शेवट केला, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असून तिचे फॉलोअर्सही हळहळ व्यक्त करत आहेत.
रोहिणी आणि निलेश पाराध्ये यांच्या अकाऊंटवर जवळपास 875 पोस्ट असून 3 लाखांपेक्षा जास्त त्यांचे फॉलोअर्स आहेत. अथक मेहनतीने चाललेलं त्यांचं हॉटेल ग्रामपंचायत यशस्वीपणे सुरू होतं, धंदा चांगला सुरू होता. ते दोघे चांगलेच लोकप्रिय होते, त्यांचा व्यवसायही वाढत होता. वरून सगळं एवढं चांगलं दिसत असताना, अवघ्या 25 वर्षांच्या रोहिणीच्या आयुष्यात असं काय घडलं की, तिने सगळं सोडून देत, मागचा पुढचा जराही विचार न करता स्वत:ला गळफास लावून घेत आयुष्य संपवलं? असा प्रश्न तिचे घरचे, कुटुंबीय आणिलाखो लोकांच्या , फॉलोअर्सच्या मनातही आहे.
त्या दिवशी काय घडलं ?
मंगळवार, 26 मे रोजी दुपारी रोहिणीने तिच्या हॉटेल ग्रामपंचायतमध्ये ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं. मात्र या दुर्दैवी घटेनच्या आधीच थोडा वेळ ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह हती, तिचं शेवटचं रील अजूनही तिच्या अकाऊंटवर असून अनेकांनी त्यावर तेव्हा कमेंट्स केल्या. तर आता तिच्या जाण्यानंतर अनेक तिला श्रद्धांजली वाहत, एवढा मोठा , टोकाचा निर्णय का घतेला असे प्रश्न कमेंटमधून देखील विचारले आहेत. त्यावरून तिची लोकप्रियता दिसून येते.
पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रं
दरम्यान रोहिणीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती आणखी वाढवली असून तिच्या या कृतीमागचं कारण शोधण्यात पोलिस व्यस्त आहेत. पोलिसांनी रोहिणी-निलेशच्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे.घटनेच्या दिवशी हॉटेलमध्ये काही घडलं होतं का हे पडताळून पाहिलं जाणार आहे. तसेच रोहिणीचा मोबाईल, तिचे कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.
आत्महत्येपूर्वी रोहिणीने कोणाशी संपर्क केला होता, तिचं कोणाशी बोलणं झालं होतं का, तिला कसला मानसिक तणाव होता का, आत्महत्येसारखं एवढं मोठं टोकाचं पाऊल तिने का उचललं? या सर्व बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
तिचा नवरा, नातेवाईक, हॉटेलमध्ये काम करणारी माणसं, तिच्या मैत्रिणी, अशा सर्वांना प्रश्न विचारण्यात येणार असून त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात येतील. त्यातून काही धागेदोर मिळतात का हेही पोलिस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
