Anjangaon Controversy: सलोखा बिघडवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत ‘अंजन’! अंजनगावातील पुतळ्याच्या वादावर तोडगा, काय झाला फैसला?
Anjangaon Chhatrapati Shivaji Maharaj Statue: राज्यात पुतळ्यावरून राजकारण पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. दोन समाज मुद्दाम एकमेकांसमोर आणले जात आहे. ज्वलंत प्रश्नांना बगल देण्यासाठी हा प्रकार केल्या जात असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. दरम्यान माढा तालुक्यातील अंजनगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा वाद शमला आहे.

Anjangaon Chhatrapati Shivaji Maharaj Statue: सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुक्यातील अंजनगावात गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वातावरण तापले होते. त्यात इतर ठिकाणच्या शिवप्रेमीं आणि लक्ष्मण हाके यांच्या ठिय्या आंदोलनाची भर पडली. वातावरण निवाळण्यासाठी कालपासूनच प्रशासन सक्रिय झाले होते. अखेर अंजनगावातील पुतळ्याच्या वादावर पडदा पडला. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांच्या डोळ्यात दोन्ही समाजाने झणझणीत अंजन घातले. अंजनगावातील पुतळ्याच्या वादावर अखेर तोडगा निघाला.
खेलोबा देवस्थानच्या जागेत नाही इथं बसणार महाराजांचा पुतळा
खेलोबा देवस्थानच्या जागेत पुतळा असल्याने तो दुसऱ्या ठिकाणी बसवण्याचा एकमताने निर्णय झाला. गावकरी, देवस्थान तसेच विशेष पोलीस महानिरीक्षकांच्यात बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. पुतळा आहे त्या जागेवरून काढून तो इतर पसंद असलेल्या जागेत उभारण्यात येणार आहे. दोन्ही गटाच्या बैठकीनंतर माजी आमदार राजन पाटील यांनी ही माहिती दिली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
राजन पाटील यांची शिष्टाई आली कामी
अंजनगावातील वादावर माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्तीनंतर पडदा पडला. गावातील दोन्ही गटाने समोपचाराने मिटवला आहे, त्यामुळे आता कोणताही वाद राहिला नाही. महाराजांचा पुतळा शासकीय जागेत बसवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मला सूचना दिल्या की यात तोडगा काढावा. त्यानंतर आम्ही काल बैठक घेऊन वाद मिटवला आहे. माझे सर्व समाजाच्या नेत्यांना आवाहन आहे की, त्यांनी आता गावात येऊ नये. कारण हा वाद मिटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की स्थानिक पातळीवर वाद असेल तर त्यांनी मिटवावा. जर वाद मिटला नाही तर मी येऊन वाद मिटवण्यासाठी येतो. मात्र काल रात्री वाद मिटलेला आहे त्यामुळे मनोज जरांगे किंवा इतर समाजाच्या कोणत्याही नेत्याने इथे दोन तीन दिवस येऊ नये. हा पुतळा शासकीय जागेत बसवणार असून पालकमंत्री गोरे यांनी डीपीसीतून 1 कोटीचा निधी दिला आहे. त्यामुळे हा वाद आता मिटला आहे, अशी माहिती मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.
फरांडे महाराजांचे आंदोलन मागे
माढ्यातील अंजनगावातील मंदिराचे पुजारी फरांडे महाराजांचे आंदोलन अखेर मागे घेतले. महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, पण त्याची जागा बदलण्याची विनंती महाराजांनी केली होती. तसेच याप्रकरणावरून दोन्ही समाजातील वाद मिटावा अशी भावना व्यक्त केली होती. मध्यरात्री 3 वाजता फरांडे महाराजांनी पाणी पिऊन आंदोलन मागे घेतले. मागील 4 दिवसापासून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु होते त्यानंतर काल रात्री पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील, गावातील दोन्ही गट आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सध्या राज्यात पुतळ्याचे राजकारणाने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक गावात अचानक मध्यरात्री महापुरुषांचा पुतळा बसवून दोन समाजात वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर येत आहे. राज्यातील मोठ्या प्रश्नांवर लक्ष हटवण्यासाठी असे प्रकार मुद्दामहून घडवून आणले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अंजनगावातील गावकऱ्यांनी समजूतदारपणा दाखवत सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी गावाचे आणि तालुक्यातील सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांनाही चांगली चपराक लागवल्याचे बोलले जात आहे. दोन्ही समाजाच्या धैर्याचे आणि समजूतदारपणाचे कौतुक होत आहे.
