Solapur Students protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासन नरमलं; सोलापूर विद्यापीठातल्या परीक्षा आता 14 जुलैपासून!
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक शिवशंकर गणपूर म्हणाले, की सर्व प्रशासन मंडळाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. 20 जूनपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार होत्या.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासन नमले आहे. सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी केलेल्या मागण्या विद्यापीठ प्रशासनाकडून मान्य करण्यात आल्या आहेत. 20 जूनपासून होणाऱ्या सर्व परीक्षा (Exams) विद्यापीठाने पुढे ढकलल्या आहेत. आता 14 जुलैपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. सविस्तर उत्तर पद्धतऐवजी आता बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा होणार आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवशंकर गणपूर यांनी याविषयीची माहिती दिली. सकाळपासून सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन (Students protest) सुरू होते. विद्यार्थ्यांनी गेटवरच दगडही ठेवला होता. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे आता मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्या मान्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
‘विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय’
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक शिवशंकर गणपूर म्हणाले, की सर्व प्रशासन मंडळाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. 20 जूनपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार होत्या. त्या परीक्षा पुढे ढकलाव्या ही पहिली मागणी होती तर एमसीक्यू ऑफलाइन पद्धतीने व्हावे, अशी दुसरी मागणी होती. या दोन्हा मागण्यांसदर्भात विद्यापीठाने कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. त्याप्रमाणे 20 जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा 14 जुलैपासून सुरू होतील. तर परीक्षेची पद्धत ऑफलाइन, एमसीक्यू ओएमआर सिस्टममध्ये असणार आहे.
खुर्चीवर दगड ठेवत मांडला होता ठिय्या
आज सकाळी सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थी कार्यकर्ते सोलापूर विद्यापीठात घुसले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेण्याची विद्यार्थी संघटनांनी मागणी केली होती. मात्र विद्यापीठाच्या कुलगुरू मृनालिनी फडणवीस यांचा एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेण्याला विरोध असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीदेखील परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठाला निवेदन दिले होते. मात्र विद्यापीठ प्रशासन या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. यावेळी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या गेटवर विद्यार्थ्यांनी खुर्चीवर दगड ठेवत ठिय्या मांडला होता.