सुनेत्रा पवार, पार्थ पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच…मोठी माहिती समोर!
सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले आहे. या भेटीत मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी करण्यात आली आहे.

Sunil Tatkare : गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. दिवंगत नेते अजित पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र हव्या होत्या, असा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून केला जात होता. परंतु अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी या विलीनीकरणाला अनुकूल अशी भूमिका घेतलेली नाही. एकीकडे विलीनीकरणाची मुद्द्यावर वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी माझा भाऊच या जगात राहिलेला नाही. दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले, असे म्हणत आता विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. दुसरीकडे अजितदादांच्या विमान अपघाताविषयीही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचं नेमकं कारण काय होतं? याबाबतची माहिती आता समोर आली आहे. खासदार सुनिल तटकरे यांनी या भेटीबाबत सविस्तर सांगितलं आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे?
सुनील तटकरे यांनी अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, अशी मागणी करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले. या भेटीनंतर तटकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी भेटीबाबत बोलताना “मी स्वत: त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार अशा सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं आहे. या पूर्ण प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे. तसं निवेदन आम्ही दिलेलं आहे,” अशी माहिती तटकरे यांनी दिली.
तसेच, निवेदनाची दखल घेत राज्य सरकार उद्या केंद्र सरकारकडे अजितदादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. तसा पत्रव्यवहार केला जाईल. मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तशी पावलं उचलली जातील, असेही तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता सीबीआयकडे हे प्रकरण गेले तर नेमकी कोणती नवी माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
