दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर हा बडा नेता होणार होता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेमध्ये आला आहे, या संदर्भात अनेक दावे, प्रतिदावे केले जात आहेत. यावर बोलताना रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईहून बारामतीला निघाले होते, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीला धडकलं क्षणात मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विमानामध्ये असलेलं अतिरिक्त इंधन, डॅमेज झालेला ब्लॅक बॉक्स आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी होणारा विलंब यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आला आहे, यावरून अनेक दावे प्रतिदावे होत आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत देखील मोठा दावा केला आहे. मला विलिनीकरणावर बोलायचं नाही, पण एक विषय मांडतो. दोन पक्ष एकत्र आले असते, दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत. भावनिकदृष्टीकोनातून, जर विलिनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे झाले असते. विलिनीकरणावर मी बोलणार नाही. कारण चर्चा भरकटते, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, दुसऱ्या गटातील लोकांना विलिनीकरणावर बोलायला आवडतं. आम्ही फक्त घात किंवा अपघात यावर बोलत आहोत. अमोल कोल्हेंना विलिनीकरणाचा विषय माहीत आहे. अमोल कोल्हेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले पाहिजे ही दादांची इच्छा होती. 13 बैठका झाल्या होत्या. ज्यांच्या घरी बैठका झाल्या, त्यांच्या घरजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासा. ट्रॅफिकचे फुटेज पाहा. नाही तर मंत्री लोढा यांच्या घरासमोरचे सीसीटीव्ही तपासा. दादा 13 वेळा वेगवेगळ्या गाडीतून विलिनीकरणाची चर्चा करण्यासाठी आले होते. घर जयंत पाटील यांचं होतं. जयंत पाटलांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे, दादांना पार्टी वाढवायची होती, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
