Maharashtra News Live : नाशिक कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प
देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवारी ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. 8 डिसेंबरपासून 14 डिसेंबरपर्यंत एक आठवडा अधिवेशनाचे कामकाज असणार आहे. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनापूर्वी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासोबतच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. विरोधक नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी सर्वत्र होर्डिंग्स लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचे होर्डिंग्स लागले आहेत. हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असले तरी आजपासूनच नेते नागपुरात येत आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
धुळे : गणेशपूर गावात ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू
धुळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. साक्री तालुक्यातील गणेशपूर गावात ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. मुलींकडून अचानक ट्रॅक्टर सुरु झाल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेत मुलींसह ट्रॅक्टर विहिरीत बुडाला. यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
-
नाशिक कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प
शनिवार रविवारची सुट्टी संपल्याने नाशिक कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या दोन तासापासून वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात नाशिक पुणे महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.
-
-
मुंबई : अंधेरी पश्चिमवरून गुंडवलीला जाणारी मेट्रो वाहतूक सुरळीत
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिग्नलच्या समस्येमुळे अंधेरी पश्चिम ते गुंडवलीला जाणारी मुंबई मेट्रो ट्रेन 5 मिनिटे उशिराने धावत होती. ती आता सुरळीत धावत आहे. रविवारी मेट्रो ट्रेन कमी असतात आणि दोन ट्रेनमधील वेळ 15 मिनिटे असते.
-
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना पुण्यात होणार
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना आता पुण्यात खेळवला जाणार आहे. 2025-26 मधील सुपर लीग टप्पा आणि अंतिम सामना आता पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. इंदोर येथे होणाऱ्या एका परिषदेच्या कारणास्तव आणि हॉटेल उपलब्धतेच्या अडचणीमुळे हे सामने पुण्यात हलवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. सुपर लीग सामने एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे आणि डी. वाय. पाटील अकॅडमी ग्राऊंड येथे खेळवले जाणार आहेत. तर अंतिम सामना एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
-
कल्याण आरटीओची रॅपिडो कंपनीवर धडक कारवाई
परवानगीशिवाय सेवा चालवल्याप्रकरणी कल्याण आरटीओने रॅपिडो कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरटीओने 47 मोटर सायकल जप्त केल्या आहेत. अनेक महिन्यापासून रॅपिडो कंपनीला अनेक नोटीसा पाठवून उत्तर न मिळाल्याने अखेर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात विविध वाहतूक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
-
-
बीड – वडवणी रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिनाची चाचणी
बीड – वडवणी रेल्वे मार्गावर स्पीड रेल्वे इंजिनची चाचणी सुरू आहे. बहुप्रतिक्षित अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील बीड ते वडवणी या ३० किलोमीटरचा टप्पा पूर्ण होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-
…तर मग आम्हाला घरी पाठवा आम्ही घरी जातो – सुनील प्रभू यांचा टोला
सत्ताधाऱ्यांना विरोधक नको असतील तर सांगावे, मग आम्हाला घरी पाठवा आम्ही घरी जातो. वरच्या सभागृहात आणि खालच्या सभागृहात दोन्हीकडे विरोधी पक्ष नेता नाहीए, त्यामुळे विरोधी पक्ष नेता तातडीने देण्यात यावा, जेणेकरून लोकशाही अबाधित राहील आणि लोकांचे प्रश्न विचारतात येतील असे ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी म्हटले आहे.
-
सप्तशृंगी गडावरून इनोव्हा कार दरीत कोसळली,पाच जण दगावल्याची भीती
नाशिक येथील सप्तशृंगी गडावरून इनोव्हा कार दरीत कोसळल्याने पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. हा अपघात गणपती पॉईंटजवळ घडला असून संरक्षक कठडा तोडून कार दरीत कोसळली आहे. देवीचे दर्शन घेऊन परतताना हा अपघात घडला आहे. स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून बचाव मोहिम सुरु आहे.
-
छत्रपती संभाजीनगर मनपासाठी इच्छुकांची भाजपाकडे उमेदवारी अर्ज मागण्यासाठी गर्दी
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी आणखी वेळ असला तरी, भारतीय जनता पार्टीने मात्र 29 प्रभागासाठी उमेदवारी अर्ज घ्यायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी उत्सुक उमेदवार हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपाच्या विभागीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत, जवळपास आज 425 इच्छुक उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीकडे छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी उमेदवारी अर्जाची मागणी केली आहे.
-
अतिवृष्टीमुळे सिताफळाच्या बागेला फटका, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका सीताफळाच्या बागाला सुद्धा बसला आहे. सिताफळाच्या बागाला फळधारणा होत नसल्याने, धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा गावातील शरद करंजकर या शेतकऱ्याने दोन एकर मधील सीताफळांच्या बागेवर कुऱ्हाड चालवून बाग मोडली आहे, त्यांनी सहा वर्षांपूर्वी दोन एकरामध्ये सिताफळाच्या 700 झाडांची लागवड केली होती.
-
तुरीच्या शेतातून 45 किलो गांजा जप्त, नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
तुरीच्या शेतातून पोलिसांनी केला 45 किलो गांजा जप्त
नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी शिवारात इस्लापूर पोलिसांची कारवाई
अंदाजे साडेचार लाख रुपये एवढी जप्त केलेल्या गांजाची किंमत
घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची पोलिसांकडून माहिती
-
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून तपोवन येथील वृक्षांची पाहणी
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून तपोवन येथील वृक्षांची पाहणी
वृक्षतोडीच्या निर्णयाला सर्वच स्तरातून केला जात आहे विरोध
राजकीय स्थरातून देखील वृक्षतोडीला होत आहे विरोध
विरोधी पक्षांसह अनेक सत्ताधारी पक्ष देखील करत आहेत विरोध
या सर्व पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांच्याकडून पाहणी
-
नांदेडमध्ये पोलिसांकडून 45 किलो गांजा जप्त
नांदेडमध्ये तुरीच्या शेतातून 45 किलो गांजा पोलिसांनी धाड टाकून जप्त केला आहे. किनवट तालुक्यातील शिवनी शिवारात इस्लापूर पोलिसांनी ही कारवाई केली. काळ्या बाजारात अंदाजे साडेचार लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांकडून जप्त करण्यात आला.
-
राजापुरात एका बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
रत्नागिरीतून मोठी बातमी समोर आली आहे. राजापुरात एका बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजापूरमधील भालावली येथील मुस्कुंडी नदीजवळ एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
-
भास्कर जाधव यांचा पक्षातच आवाज दाबला जातोय : प्रवीण दरेकर
भास्कर जाधव यांचा आवाज आम्ही दाबत नाही.तर पक्षातच त्यांचा आवाज दाबला जातोय. चिपळूणला नगराध्यक्षाच्या ऊमेदवारासोबत काय झालं ते पहावं, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी भास्कर जाधव यांना सुनावलं आहे.
तसेच हे लोकांच्या प्रश्नांवर बोलत नाही, त्यामुळे मार्गदर्शक सूचना करण्याच्या तयारीत नाही. रस्त्यावर पत्रकार परिषद घेत आहे कारण तुम्हाला जनतेनं रस्त्यावर आणलं, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.
-
सोयाबीनला हमीभाव दिला जात नाही : अनिल देशमुख
आगामी राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांनी परंपरेनुसार बहिष्कार घातला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दरवेळेस चहापानाचा कार्यक्रम होत असतो. तसेच विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना विजय वड्डेटीवार, अनिल देशमुख आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
तसेच विदर्भात अधिवेशन, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय मिळायला हवा. विदर्भातला शेतकरी अडचणीत आहे. सोयाबीनला हमीभाव दिला जात नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.
-
धुळे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा
बीड आणि धाराशिव पोलिसांसह महामार्ग सुरक्षा पथकाकडून धुळे सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बीड ते तुळजापूर दरम्यान होत असलेल्या जबरी चोरी, लुटमार, दरोड्याच्या घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी मांजरसुंबा घाटासह दहा ठिकाणं धोकादायक असल्याचे जाहीर करत प्रवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. हॉटेल चालक, महामार्ग लगतच्या गावातील ग्राम सुरक्षा दल, सरपंच, पोलीस पाटील अशा सर्व घटकांना ॲक्टिव्ह करण्यात आले असुन अशा घटना रोखण्यासाठी, अशा घटनांचे शिकार झालेल्या लोकांना तात्काळ मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठीचे संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत. तर 7 वाहनं देखील तैनात करण्यात आले आहेत.
-
नायलॉन मांज्यामुळे 3 वर्षाच्या चिमुरड्याचा गळा चिरला
स्वरांश नावाच्या 3 वर्षाच्या चिमुरड्याचा नायलॉन मांज्या मुळे गळा चिरला.स्वरांशवर एमजीएम रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत.मुलाच्या वडलांची या नायलॉन माज्या विक्रेत्या विरुद्ध ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. स्वरांश याचा मांज्यांमुळे गळा चिरल्याने 20 च्यावर टाके पडले आहेत. वारंवार घटना घडूनही पोलीसया नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध का कारवाई करत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
-
स्ट्राँग रूमबाहेर उमेदवारांचा कडक पहारा
परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी स्ट्राँग रूमवर 24 तास पहारा देत आहे.तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे आम्हाला कोणावर विश्वास नसल्यामुळे आम्ही पहारा देत असल्याचा कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रभागाच्या दोन नगरसेवक 24 तास स्ट्रॉंग रूममध्ये पहारा देत आहे.जिंतूर नगरपालिकेत भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी लढत रंगली आहे.
-
मतदान यंत्र सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षे बाहेर पोलिसांसह उमेदवारांची खाजगी सुरक्षा लावण्यात आली. शिवसेना (शिंदे) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांनी मतदान यंत्र सुरक्षा कक्षे बाहेर खाजगी सुरक्षा रक्षक नेमले. सीसीटीव्ही आणि पोलिसांचा मतदान यंत्र सुरक्षा कक्षे बाहेर खडा पहारा देत आहेत. मतमोजणीपूर्वी सुरू झालेली सुरक्षा स्पर्धा जनतेत आणि कार्यकर्त्यांत कुतूहलचा विषय ठरला आहे.
-
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदार चंद्रकांत दादांसोबत चार्टर्ड विमानाने नागपूरला
इंडिगो विमान सेवेचा फटका आता राज्यातील अनेक आमदारांना पण बसलेला पाहायला मिळतोय.. उद्यापासून नागपूर आत राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून राज्यभरातील सर्वपक्षीय आमदारांना आज नागपूरला पोहोचायचं आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून इंडिगो या विमान कंपनीचा झालेला गोंधळ आणि इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने आता अनेक आमदारांची तिकिटं रद्द झालेली पाहायला मिळत आहेत.. त्यातच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील ज्या आमदारांना नागपूरला पोहोचायचं आहे त्या आमदारांनी आता थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चार्टर्ड विमानाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.. चंद्रकांत पाटील आज दुपारी चार्ट विमानाने पुण्याहून नागपूरला रवाना होणार आहेत तर आम्ही देखील अनेक आमदार दादांसोबत जाणार असल्याचं पुण्याच्या शिवाजीनगर मतदारसघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितलं आहे.
-
ही चूक इंडिगोचीच
सर्व प्रवाशांना मानसिक त्रास झाला आहे. अनेक अडचणीला समोर जावं लागलं आहे. इंडिगो मुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे. इंडिगोने ज्या काही गोष्टी कार्याला पाहिजे होता त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. विमान सेवा देणाऱ्या कंपनी आहे पायलट संघटनेने मागणी केली होती की ड्युटी चे वेळा कमी करायला पाहिजे त्यानंतर डी जी सी ए ने दिले याची अंबजावणी २ टप्प्यात करण्यात यावी असं प्रत्येक विमान कंपनी ने नियम दिले त्याचे बदल करावे मात्र इंडिगो ने यावर काम केलं नाही, असे केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
-
ग्राम महसूल अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ग्राम महसूल अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण. गावठी कट्टा लावत अवैध वाळूची वाहतूक करणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील, ग्राममहसुल अधिकारी जितेंद्र पाटील अशी मारहाण झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची नावे आहेत. ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या 6 जणांच्या पथकाने अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर व जेसीबी कारवाईसाठी अडवले होते.
-
आमदारांनाही इंडिगो विमान सेवेचा फटका
इंडिगो विमान सेवेचा फटका आता राज्यातील अनेक आमदारांना बसलेला पाहायला मिळतोय. उद्यापासून नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. राज्यभरातील सर्वपक्षीय आमदारांना आज नागपूरला पोहोचायचं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून इंडिगो या विमान कंपनीचा झालेला गोंधळ आणि इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्या. आता अनेक आमदारांची तिकिटं रद्द झालेली पाहायला मिळत आहेत.
-
तपोवनमध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांकडून प्रोग्राम
तपोवनमध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांकडून पर्यावरणावर संगीतमय सहभाग प्रोग्राम. वृक्षवल्ली आम्हा सोयरे यासारख्या विविध अभंग गायन करत वृक्षतोडीचा निषेध. नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या माध्यमातून आज तपोवनमध्ये वृक्ष वाचविण्याच्या समर्थनार्थ गायनाचा कार्यक्रम.
-
मुनी असाल तर खोटं बोलणं पाप आहे हे लक्षात ठेवा – अखिल चित्रे
“शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात” हा आरोप सरळसरळ खोटा आहे.आमचे खासदार,आमदार,नगरसेवक प्रत्येक मुंबईकराची सेवा करतात, धर्म-जात न पाहता. आणि हो,विलेपार्ल्यातला जैनालय नेमक कुणामुळे वाचला?तो तोडला जात होता तेव्हा कुणाचं सरकार होतं, याचाही जरा मागोवा घ्या” असं ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे म्हणाले.
-
नाशिक मध्ये थंडी वाढली पारा 4 अंश खाली
नाशिक मध्ये थंडी वाढली पारा 4 अंश खाली पोहोचला आहे. शहरात कमाल तापमानात मोठी घसरण 22 वरून थेट 27 वर पोहोचली आहे. पुढील 2 दिवस थंडीत वाढ होणार असून त्यानंतर थंडीची लाट येण्याची शक्यता नोंदवण्यात आली आहे. शहरात किमान तापमान हे 11.5 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 27.2 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. सकाळी आणि सायंकाळी थंडी असते, दिवसभर वातावरण नियमित होतं. आता मात्र पुढील 2 दिवस थंडीत वाढ होणार आहे.
-
ठाणे जिल्ह्यात 24 हजार 121 संशयित रुग्णाची तपासणी, 223 नवे कुष्ठरुग्ण
ठाणे जिल्ह्यात 24 हजार 121 संशयित रुग्णाची तपासणी केली असता त्यामध्ये 223 नवे कुष्ठरुग्ण आढळले आहेत. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये आरोग्य विभागाची सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. नव्या रुग्णांची होणारी नोंद चिंताजनक असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. नवे कुष्ठरोग असलेले रुग्ण आढळून आलेले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
-
ठाण्यात 500 टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प महापालिका स्वतः उभारणार
ठाण्यात 500 टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प महापालिका स्वतः उभारणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे महापालिकेने शहरातील वाढत्या ओल्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भिवंडीतील आतकोली परिसरात 500 टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प स्वतः उभारण्याचा निर्णय घेतला आहे.. 1200 मॅट्रिक टन कचरा शहरातून दररोज तयार होतो..
-
ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात कारमध्ये महिलेवर दोघांचा सामूहिक अत्याचार
केकमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॅमिली कोर्टाच्या आवारात चार चाकी वाहनात हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी सामूहिक अत्याचार केला. हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार हा फरार आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली…
-
जालन्यात पाचट पेटवल्याने १५ एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शिवारात शेजारील शेतकऱ्याने उसाचे पाचट पेटवल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत परिसरातील पाच शेतकऱ्यांचा मिळून तब्बल १५ एकर ऊस जळून खाक झाला असून, यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पंडित केशवराव जिगे (२.५ एकर), बद्री जिगे (३ एकर), दिपक जिगे (४ एकर) आणि कैलास जिगे (५ एकर) यांचा ऊस व शेतातील पाईप्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली, मात्र या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
-
नागपुरात सर्वत्र होर्डिंग्स, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत
नागपूरमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात होर्डिंग्स लावण्यता आले आहेत. या अधिवेशनासाठी आजपासूनच नेत्यांचे नागपुरात आगमन सुरू झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी सर्वत्र मोठे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचे हे होर्डिंग लक्ष वेधून घेत आहेत, ज्यामुळे नागपूरमध्ये राजकीय उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
-
धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला, थंडीचा कडाका वाढला
धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला असून, आज तापमान 7.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे आता रब्बी पिकांवर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
-
जालना पालिका आक्रमक, १०२ कोटींच्या वसुलीसाठी ३१ हजारांहून अधिक मालमत्ता धारकांना नोटीस
जालना शहरातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीकडे मालमत्ता धारक दुर्लक्ष करत असल्याने पालिका प्रशासन आता आक्रमक झाले आहे. मागील काही दिवसांपासून कर वसुलीत अपयशी ठरलेल्या प्रशासनाने थकबाकी वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. सुमारे ३१ हजार ४६३ मालमत्ता धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील नागरिकांकडे तब्बल १०२ कोटी रुपयांची पाणीपट्टी आणि मालमत्ता कराची थकबाकी आहे. ही थकबाकी तातडीने न भरल्यास नोटीस देऊन मालमत्ता जप्त करण्यात येईल, असा थेट इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजामुळे ३ वर्षीय बालकाचा गळा कापला
छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजामुळे जीवघेणा अपघात झाल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा सेंट्रल नाका परिसरात समोर आली आहे. आई-वडिलांसोबत दुचाकीवरून निघालेल्या स्वरांश संजीव जाधव या तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या गळ्याला मांजा अडकला आणि गंभीर रक्तस्राव सुरू झाला. वडिलांनी तातडीने मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी, स्वरांशच्या गळ्यावर खोल जखम झाली. त्याला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तातडीने शस्त्रक्रिया करून २० पेक्षा जास्त टाके देण्यात आले असून सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. नायलॉन मांजावर बंदी असूनही शहरात सर्रास त्याचा वापर होत असल्याने निष्पाप जीवांना धोका निर्माण झाला आहे; या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
-
नाशिक तपोवन वृक्षतोड आंदोलन, प्रशासन-आंदोलक उद्या चर्चा करणार
नाशिकच्या तपोवन परिसरातील झाड तोडण्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर उद्या सोमवार दिनांक ८ डिसेंबरला तोडगा निघण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने अधिकारी उद्या आंदोलकांशी चर्चेसाठी निमंत्रण देऊन संवाद साधणार आहेत. तपोवन येथे साधूग्राम तयार करण्यासाठी काही झाडे काढावी लागतील, या प्रशासनाच्या भूमिकेमुळे हे आंदोलन सुरू झाले होते. विशेष म्हणजे याच भागात होणाऱ्या वादग्रस्त एक्झिबिशन सेंटर प्रकल्पाला आता तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. उद्याच्या चर्चेनंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
-
विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत, जळगाव हादरले
जळगावच्या मास्टर कॉलनीमध्ये विजेच्या धक्क्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घराशेजारून गेलेल्या विजेच्या तारांना पाईप साफ करण्याच्या लोखंडी सळईचा धक्का लागून ही दुर्घटना घडली होती. या घटनेत फातेमा अजिम पठाण (१०) ही गंभीर जखमी झाली होती, तर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या वडिलांसह आणखी एका मुलीचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेच्या २६ तासांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता, फातेमा हिचाही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एकाच घटनेत कुटुंबातील तिघांना गमवावे लागल्याने मास्टर कॉलनीवर शोककळा पसरली आहे.
-
गंगापूर रोडवर भीषण अपघात, भरधाव बसने दुचाकीला चिरडले, एकाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर रोडवर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव बसने रस्ता ओलंडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एका ५६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना वैजापूर तालुक्यातील क्रांती फिटनेस क्लबजवळ घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून भगवान माणिकराव सुलताने असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.धडकेनंतर सुलताने गंभीर जखमी झाले होते. उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सुलताने हे सावखेड गंगा येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. या घटनेची नोंद वैजापूर पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
-
नागपूर अधिवेशनाला विमानाचा फटका, अधिवेशनाला पोहोचण्यासाठी समृद्धी महामार्गाचा पर्याय
नागपूरमध्ये उद्यापासून (सोमवार ८ डिसेंबर) सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर इंडिगो (Indigo) विमानाच्या गोंधळाचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर मार्गावरील उड्डाणे वारंवार रद्द होत असल्याने आता मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांचेही नियोजन कोलमडले आहे. अनेक मंत्री आणि आमदारांना अधिवेशनासाठी आज नागपुरात दाखल होणे आवश्यक असताना ऐनवेळी विमाने रद्द झाल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. या गोंधळामुळे अनेक लोकप्रतिनिधी आता विमान प्रवासाचा पर्याय सोडून समृद्धी महामार्गाचा वापर करून अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नागपुरात पोहोचताना दिसत आहेत.
Published On - Dec 07,2025 9:08 AM
