Sanjay Raut : उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार का? दिल्लीतून कुणाकुणाची विनंती? संजय राऊत यांनी थेटच सांगितलं
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीची चर्चा शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेवर जावे असा आग्रह होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांना विनंती केली आहे. संजय राऊत यांनी सांगितले की उद्धव ठाकरे याबाबत लवकरच निर्णय घेतील. राजकीय वर्तुळात आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

राज्यभरात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. राज्यातील एकूण 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून 12 मे ला मतदान होणार आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष या निवडणुकीकडे केंद्रीत झालं आहे. 12 ले मतदान आणि दुपारीलगेच मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांची विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार असून त्यामुळे आता मविआकडून कोणाला संधि मिळमार अशी चर्चा सुरू झाली आहे.
यावरून खलबतं सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली. विधानपरिषदेसाठी काँग्र, एनसीपी दोघांचाही पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर राऊतांनी दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार की नाही यावरही ते स्पष्टच बोलले. यासंबंधी दिल्लीतून कोणाकोणाचे फोन आले, याबद्दलही राऊत बोलले.
काय म्हणाले राऊत ?
पाठिंबा हा शब्द चुकीचा आहे. विधानपरिषदेसाठी मी उमेदवार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं नाही, त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. काल काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले होते. सविस्तर चर्चा केली. फक्त विधान परिषद या एका विषयावर चर्चा केली नाही. भविष्यातील अनेक घडामोडी, महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणं, येणाऱ्या लोकसभा आणि संघटनात्मक कामावर चर्चा झाली असं राऊत यांनी नमूद केलं.
आपण राज्यसभेत शरद पवार यांच्यासारखा महत्त्वाचा नेता पाठवला. आणि विधान परिषदेला उद्धव ठाकरेंसारखा एक महत्त्वाचा माणूस गेला पाहिजे. तुम्ही विधान परिषदेत असणं महाविकास आघाडीच्या आमदारांना दिलासा देणारं असेल, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. राष्ट्रवादीनेही तीच भूमिका मांडली. शशिकांत शिंदे यांचाही फोन होता. आम्ही आमचं शिष्टमंडळ घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला येणार आहोत. तुम्हीच विधान परिषदेत जावं असं त्यांचं म्हणणं असल्याचं राऊतांनी यावेळी सांगितलं.
आता ते निर्णय घेतील
विधान परिषदेवर जाणार की नाही, यासंबंधी भूमिका कधी जाहीर करावी हे, उद्धव ठाकरे ठरवतील. तुम्ही सांगू शकत नाही. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना विधान परिषदेत जाण्याची विनंती केली आहे. आम्हीही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे, आता निर्णय ते घेतील. आम्ही काँग्रेस पक्षाशी चर्चा केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष काल मातोश्रीवर आले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेंशी चर्चा झाली. त्यांनीही विनंती केली असं संजय राऊतांनी सांगितलं. राजकारणात इच्छुक का असू नये. राहुल गांधी, खरगे, सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे यांचा उत्तम संवाद आहे. त्यामुळे काल सपकाळ उद्धव ठाकरेंकडे आले होते. सुप्रिया सुळे यांनीही भूमिका जाहीर केली आहे. त्या भूमिका महत्त्वाच्या आहेत, असं राऊतांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातही तुम्हाला मराठी आलंच पाहिजे
महाराष्ट्राच रिक्षा चालकांना मराठी आलंच पाहिजे अशी भूमिका परिवहन मंत्र्यांनी घेतली आहे. पण शिंदे गाटतूनच (संजय निरूपम) यांचा या सक्तीला विरोध आहे. त्यावरून राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ” मराठी सक्तीची भूमिका योग्य आहे, असं एकनाथ शिंदे, फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनी ठामपणे सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून हे लोक कसे काय राहू शकतात?. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. त्या त्या राज्यातील मातृभाषेत काम झालं पाहिजे. महाराष्ट्रातही तुम्हाला मराठी आलंच पाहिजे.” असं राऊत म्हणाले.
