राजकारणात खळबळ, भाजपने काँग्रेसचा माजी प्रदेशाध्यक्ष फोडला, मुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन घेतली भेट
Congress : काँग्रेसची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्यासोबत इतरही नेते भाजपमध्ये सामील होणार आहेत.

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भूपेन बोरा हे 22 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती दिली आहे. बोरा यांच्यासह बरेच काँग्रेस नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आसामध्ये काँग्रेसला मोठा बसणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भूपेन बोरा भाजपमध्ये प्रवेश करणार
समोर आलेल्या माहितीनुसार, भूपेन बोरा यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र वरिष्ठ नेतृत्वाने समजूत काढल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला असल्याचे समोर आले होते. राहुल गांधी देखील त्यांना फोन केला होता अशीही माहिती समोर आली होती. मात्र आज ते भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. बोरा यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी आणि मुलाने आरती करून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.
हिमंता सरमा काय म्हणाले?
आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी म्हटले की, ‘राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी बोरा यांना पक्षात घेण्यासाठी आधीच मान्यता दिली आहे. भाजपमध्ये त्यांचे स्वागत आहे. भूपेन बोरा यांना आदर दिला जाईल. भाजपमध्ये सामील होणे त्यांच्यासाठी घरवापसी असेल, कारण हा पक्ष त्यांच्यासारख्या लोकांसाठी आहे जे त्यांच्या वडिलांच्या राजकारणाचा वारसा पाळत नाहीत.’
भूपेन बोरा यांनी काय म्हटले?
आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी आज सकाळी बोलताना म्हटले होते की, मंगळवारी रात्रीपर्यंत राजीनामा मागे घ्यायचा की नाही याबद्दल अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. तसेच जवळच्या सहकाऱ्यांशी आणि लखीमपूर जिल्ह्यातील लोकांशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचेही बोरा म्हणाले होते. दरम्यान, गेल्या काही काळापासून बोरा हे पक्षांतर्गत कलहामुळे नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. आता ते भाजपमध्ये सामील होणार असल्याचे समोर आले आहे.
