वहिनीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘तिसरा डोळा’! दिराने बेडरूममध्ये CCTV कॅमेरा लावला; प्रकरण जाणून पोलिसही हैराण
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दिराने हुंड्यासाठी वहिनीच्या बेडरुममध्ये आणि स्वयंपाकघरात CCTV कॅमेरे लावून तिच्यावर लक्ष ठेवले. ती नेमकं काय करते आणि काय करत नाही हे सतत पाहात राहिला. जेव्हा हे प्रकरण पोलिसांसमोर आले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या...

आगरा येथील ट्रांस यमुना परिसरात हे प्रकरण घडले आहे. हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेच्या बेडरूम आणि स्वयंपाकघरात CCTV कॅमेरे लावून तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, १५ लाख रुपये खर्च करूनही सासरकडची मंडळी कार आणि रोख रकमेसाठी तिचा छळ करत होते. सतत तिचा अपमान करत होते.
नेमकं प्रकरण काय?
पीडितेचे लग्न १२ मार्च २०१९ रोजी हिंदू रितीरिवाजानुसार कपिल देव यांच्याशी झाले होते. माहेरच्या बाजूने सांगितले की, लग्नात सुमारे १५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता. यात सोने-चांदीचे दागिने, फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, ५.५१ लाख रुपये रोख आणि एक बुलेट मोटरसायकल यांचा समावेश होता. तरीही सासर पक्ष समाधानी नव्हता. पीडितेचा आरोप आहे की, लग्नानंतर लगेच वॅगन-आर कार आणि 2 लाख रुपये रोख मागणी सुरू झाली. मागणी पूर्ण न झाल्याने तिला सतत टोमणे मारले गेले, शिवीगाळ केली गेली आणि मारहाण झाली. दोन मुलांचा जन्म झाला – ४ वर्षांचा कुणाल आणि 2 महिन्यांचा रियांश – तरीही कथित छळ थांबला नाही.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दिराने घरात असे CCTV कॅमेरे बसवले की ज्यांची रेकॉर्डिंग पीडितेच्या स्वयंपाकघर आणि बेडरूमपर्यंत होत होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार, हे सर्व तिला मानसिकरित्या त्रास देण्यासाठी आणि अपमानित करण्यासाठी केले गेले. जेव्हा तिने कॅमेऱ्यांची दिशा बदलण्याची किंवा रेकॉर्डिंग बंद करण्याची विनंती केली, तेव्हा वाद आणखी वाढला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पती, दिर, सासू-सासरे आणि जाव यांनी एकत्र येऊन तिला मारहाण केली आणि धमकी दिली की, हुंडा आणला नाही तर तिला घराबाहेर काढून दुसरे लग्न करून टाकतील. आरडाओरड ऐकून शेजारी आले, पण त्यांनाही धमकावण्यात आले.
आरोप आहे की, १२ डिसेंबर २०२५ रोजी पीडितेला दोन्ही लहान मुलांसह घराबाहेर काढले गेले. तेव्हा लहान मुलगा रियांशची प्रकृती गंभीर होती, पण सासरच्या लोकांनी उपचारही केले नाहीत. माहेरच्या लोकांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले आणि संपूर्ण खर्च उचलला. पीडितेचे म्हणणे आहे की, लग्नात दिलेले संपूर्ण दान-हुंडा आणि स्त्रीधन सासरच्या मंडळींकडे आहे. जे परत करण्यास नकार दिला जात आहे. सध्या पोलिसांनी तक्रारीच्या आधारे प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
