CJP : निवडणुकीच्या मैदानात उतरणार CJP ? भाजपकडूनही ऑफर ? सौरव दास यांनी स्पष्टच सांगितलं..
जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर सीजेपीला (CJP) जगभरात ओळख मिळाली. या पक्षाच्या राजकीय भविष्याबद्दल उत्सुकता असताना, सह-संयोजक सौरव दास यांनी गूढ कायम ठेवले आहे. भाजपसह अनेक पक्षांकडून ऑफर येत असल्याचा दावा त्यांनी केला.

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचं (CJP) नावं फक्त देशातच नाही तर जगभरात पोहोचलं. अभिजीत दीपके, सौरव दास यांच्या नावाचीही बरीच चर्चा झाली. मात्र हा पक्ष सक्रीय राजकारणात कधी उतरतो, याचीही अनेकांना उत्सुकता आहे. त्यावर अभिजीत दीपके यांनी भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान भविष्यात सीजेपी निवडणुकीच्या राजकारणात उतरणार की नाही याबाबत पक्षाचे सह-संयोजक सौरव दास यांनी गूढ कायम ठेवलं आहे. मात्र अनेक पक्षांकडून आपल्याला ऑफर्स येत असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला. एवढंच नव्हे तर ज्या सरकारविरोधात त्यांनी लढा दिला, केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागितला, त्याच भाजपकडूनही ऑफर येत असल्याचं दास म्हणाले. एनडीएमध्ये सहभागी असलेले रामदास आठवले यांनी अभिजीत दीपके यांना आपल्या सोबत येण्याचे दिलेल्या निमंत्रणाचीही त्यांनी आठवण करून दिली.
एक दिवसाआधीच सौरव दास यांनी 5 तारखेला होणारा प्रस्तावित निषेध मोर्चा मागे घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दास यांनी सध्याच्या घडामोडींवर समाधान व्यक्त केलं. एवढंच नव्हे तर ‘स्कूल ठीक करो’सह विविध मुद्द्यांवर CJP यापुढेही काम करत राहणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.“अजूनही खूप काही सुधारण्याची गरज आहे,” असेही दास म्हणाले.
100 फोन येत असतात
भविष्यात राजकारणात उतरणार का, याबाबत सीजेपीचे सौरव दास यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘उद्या राहुल गांधी यांच्या कार्यालयातून फोन आला तर काय?’ असा प्रश्न विचारला जात असतानाच त्यांनी मध्येच उत्तर देत अशा प्रकारे आपल्याला अनेक राजकीय पक्षांकडून संपर्क केला जात असल्याचं, त्यांनी सांगितलं. ‘ आज आम्ही एक प्रेशर ग्रुप आहोत. आम्हाला सगळीकडून 100 फोन कॉल्स येतात, हे तर सगळ्यांना माहीत आहे ,’ असं सौरव दासने सांगितलं.
भाजपकडूनही आला का कॉल ?
तुम्हाला भाजपकडूनही फोन आला का, असा प्रश्व विचारल्यावरही त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता अगदी स्पष्ट उत्तर दिलं.’ भाजपवाल्यांकडून कॉल आलाय.. सगळ्यांकडून आलाय.. सगळे म्हणतात आमच्यासोबत या. दीपके यांनी तर हे उघडपणे सांगितलं होतं. रामदास आठवलेंनी देखील आम्हाला सोबत येण्याची ऑफर दिली होती. या सगळ्या गोष्टी होतच राहतात. आम्हाला आत्तापर्यंत एकाही पक्षाकडून कॉल वगैरे काही आला नाही हा.. असं खोटं आम्ही नक्कीच सांगणार नाही .. त्यात काहीच अर्थ नाही’ असं दास यांनी सांगितलं.
व्यवस्था सडलेली आहे
राजकीय पक्षांकडून येणाऱ्या ऑफर्सबाबत बोलताना दास यांनी सध्याच्या व्यवस्थेवरही जोरदार टीका केली.’ सडलेले लोक सध्या सिस्टीममध्ये बसले आहेत, जे चांगले लोक आहेत ते त्यांच्यासोबत यावेत असं त्यांना वाटत, जेणेकरून त्यांना काही त्रास होणार नाही. आमच्याबाबतीतही हेच घडत आहे. मात्र, आम्ही एक प्रेशर ग्रुप आहोत, हे आम्हाला अगदी क्लिअरली माहीत आहे. हा प्रेशर ग्रुप इतका प्रभावशाली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ८० वर्षांत जो आदेश दिला नव्हता, तो आमच्यामुळे झाला,’ असा दावा दास यांनी केला.
