महात्मा गांधींचा मृत्यू अपघातात, सरकारी पत्रकाचा जावई शोध
उडिशा सरकारच्या एका पत्रकामध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येला (Death of Mahatma Gandhi and Accident) केवळ ‘अपघात’ म्हटलं आहे.
भुवनेश्वर : उडिशा सरकारच्या एका पत्रकामध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येला (Death of Mahatma Gandhi and Accident) केवळ ‘अपघात’ म्हटलं आहे. त्यामुळं मोठं वादंग निर्माण झालं आहे. दोन पानांचं ‘आमा बापूजी : एक झलक’ हे पत्रक उडिशा सरकारच्या शिक्षण विभागानं तयार केलं आहे. यात महात्मा गांधी यांचा मृत्यू (Death of Mahatma Gandhi and Accident) 30 जानेवारी 1948 रोजी काही अपघाती कारणांमुळे झाल्याचं सांगण्यात आलं आहे. उडिशा विधानसभेचे अध्यक्ष सूर्य नारायण पात्रो यांनी याप्रकरणी राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
उडिशा सरकारने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने संबंधित पत्रकाच्या लाखो प्रती विद्यार्थ्यांमध्ये वितरीत केल्या आहेत. यात महात्मा गांधींचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिरला हाऊस या ठिकाणी अचानक झालेल्या घटनांमध्ये अपघाताने झाल्याचं म्हटलं आहे.
सरकारकडून तपास समितीची नेमणूक, मंत्र्याचं स्पष्टीकरण
दरम्यान, उडिशा सरकारने या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. उडिशाचे शिक्षणमंत्री समीर रंजन दास म्हणाले, “ज्याने हा प्रकार केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईन. महात्मा गांधींची हत्या झाली होती. त्याचा उल्लेख त्याचप्रमाणे करायला हवा. तसेच त्यांची हत्या कशी झाली हेही स्पष्टपणे सांगायला हवे.”
काँग्रेस विधीमंडळ नेते नरसिंह मिश्रा यांनी यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना दोषी म्हणत त्याच्या माफीची मागणी केली आहे. मिश्रा म्हणाले, “हे अत्यंत दुखद आहे. मी यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार मानतो. त्यांनी तात्काळ जनतेची माफी मागायला हवी. जर मुख्यमंत्र्यांनी हे जाणूनबूजून केलं असेल, तर मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. देशाची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.
‘उडिशा सरकारला महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसे आहे हे मान्य नाही’
या प्रकरणावरुन उडिशा सरकारला नथुराम गोडसे महात्मा गांधींचा हत्यारा आहे हे मान्य नाही, असंच दिसत आहे. हा लाजिरवाणा प्रकार आहे. मात्र, नथुराम गोडसेला फाशी देण्यात आली आहे, असंही मिश्रा यांनी नमूद केलं.
बीजू जनता दलाचे सदस्य सौम्य रंजन पटनायक यांनी देखील महात्मा गांधी यांच्या हत्येच्या या उल्लेखाचा निषेध केला. पटनायक म्हणाले, “ही कृती म्हणजे इतिहासाला पुन्हा लिहिण्याचं षडयंत्र आहे. प्रत्येकाने आपली विचारधारा विसरुन याचा निषेध करायला हवा.