TVK Vijay : विजयची खिल्ली उडवली, जिव्हारी लागणारे शब्द वापरले, ‘तो फक्त Actor, त्याच्याकडे तर बेसिक..’
TVK Vijay : तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजयने चमत्कार घडवला आहे. जनतेने त्याला राजकीय नेत्यांमध्ये नायक म्हणून निवडलं आहे. पण त्याचा हा विजय पचवणं भल्या, भल्या नेत्यांना जमत नाहीय. विजयबद्दल जिव्हारी लागणारे शब्द बोलण्यास आता सुरुवात झाली आहे.

सध्या सगळ्या देशात तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालाची चर्चा आहे. कारण तामिळ जनतेने पूर्णपणे भिन्न कौल दिला आहे. तामिळनाडूतील राजकीय पक्षांना सुद्धा या निकालाने धक्का दिला आहे. इतका मोठा राजकीय बदल तामिळनाडूच्या राजकारणात होईल याची तिथल्या राजकीय पक्षांना सुद्धा कल्पना नव्हती. त्यांच्यासाठी हा अनपेक्षित निकाल आहे. अगदी दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेला ‘तमिलगा वेत्री कडगम’ TVK हा तामिळनाडूच्या राजकारणातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण तामिळ जनतेने TVK ला पूर्ण बहुमत दिलेलं नाही. त्रिशंकू कौल दिला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच फसला आहे. 234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. TVK या पक्षाला एकूण 107 जागा मिळाल्या आहेत.
बहुमतासाठी अजून 11 जागांची आवश्यकता आहे. भले, हा आकडा छोटा वाटत असला तरी या 11 जागांसाठी पाठिंबा मिळवणं सोपं नाहीय. थलपती विजयला आपलं राजकीय कौशल्य दाखवून द्यावं लागणार आहे. काँग्रेसने टीव्हीकेला आधीच आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसकडे पाच आमदार आहेत. पण अजून सहा आमदारांची आवश्यकता आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांनी आपण विजयच्या टीव्हीकेसोबत जाणार नाही, असं म्हटलं आहे. अण्णाद्रमुकचे नेते केपी अंबलगन यांनी विजयला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ‘चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्धीमुळे कोणी सरकार स्थापन करण्यास पात्र ठरत नाही’ असं अंबलगन म्हणाले.
विजयकडे ती बेसिक पात्रताही नाही
“सरकार स्थापन करण्यासाठी एक ठराविक पात्रात लागते. पण विजयकडे ती बेसिक पात्रताही नाही. तो फक्त एक सिनेमातला अभिनेता आहे. त्याच कारणामुळे AIADMK विजयच्या पक्षाला पाठिंबा देणार नाही. आम्ही विजयचं समर्थन करणार नाही” असं केपी अंबलगन यांनी स्पष्ट केलं. “इदापादी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरु आहे. आम्ही शेवटपर्यंत विजयच समर्थन करणार नाही” असं अंबलगन यांनी सांगितलं.
राज्यपालांच्या भूमिकेवरुन राजकारण
तामिळनाडूत राज्यपालांच्या भूमिकेवरुनही आता राजकारण सुरु झालं आहे. थलपती विजय यांनी आतापर्यंत दोनवेळा राज्यपालांची भेट घेतली आहे. TVK राज्यातील मोठा पक्ष असल्यामुळे त्यांना सरकार स्थापनेची पहिली संधी द्यावी असं काहीचं म्हणणं आहे. पण राज्यपालांनी विजयला आधी बहुमत सिद्ध करायला सांगितलं आहे.
