India-Pakistan War Situation : रात्री बॉर्डरवर खूप काही मोठं घडलय, पाकिस्तानची फतेह मिसाइल हवेतच नष्ट
India-Pakistan War Situation : भारताने बॅलेस्टिक मिसाइलद्वारे आमच्या तीन एअरबेसना टार्गेट केलं. रात्री उशिरा भारताने पाकिस्तानात एकापाठोपाठ एक 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागले, असा पाकिस्तानकडून दावा करण्यात येत आहे. दरम्यान सलग तिसऱ्यादिवशी पाकिस्तानने भारतावर अयशस्वी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला.

भारत-पाकिस्तान तणावाने टोक गाठलं आहे. पाकिस्तानने सलग तिसऱ्यादिवशी POK आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सीजफायरच उल्लंघन केलय. पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती राज्यातील जवळपास 26 ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा नापाक प्रयत्न केला. सर्तक असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचे हे सर्व प्रयत्न उधळून लावले. या दरम्यान पाकिस्तानने दावा केला आहे की, भारताने रावळपिंडीमधील नूर खान एअरबेस, शोरकोटमधील रफिकी एअर फोर्स तळ आणि मुरीद एअरफोर्स बेसला टार्गेट केल. भारताने या तिन्ही एअर बेसवर बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला केला, असा पाकिस्तानने दावा केला आहे. दरम्यान पाकिस्तानकडून भारतावर फतेह-1 मिसाइलने हल्ला करण्यात आला. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी फतेह-1 मिसाइल हवेतच नष्ट केलं. फतेह-1 ही बॅलेस्टिक मिसाइल असून ती खतरनाक मानली जाते.
पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने म्हटलय की, भारताने बॅलेस्टिक मिसाइलद्वारे त्यांच्या तीन एअरबेसना टार्गेट केलं. त्यांचं म्हणणं आहे की, रात्री उशिराने भारताने पाकिस्तानात एकापाठोपाठ एक 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागले. या हल्ल्यात पाकिस्तानातील रावळपिंडीमधील नूर खान एअरबेस, शोरकोटमधील रफिकी एअर फोर्स तळ आणि मुरीद एअरफोर्स बेसला टार्गेट करण्यात आलं. भारताने अजून याची पुष्टी केलेली नाही.
पाकिस्तानी प्रवक्त्याचा दावा काय?
‘सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा रावळपिंडीजवळ तीन स्फोटाचे आवाज ऐकू आले. यात एक मोठा स्फोट नूर खान एअरबेस जवळ झाला. रावळपिंडीमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटाचा आवाज इस्लामाबादपर्यंत ऐकू गेला. पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यानुसार, भारताने मिसाइलद्वारे तीन एअरबेसना टार्गेट केलं. एअरफोर्सची संपत्ती सुरक्षित असून त्यांचं नुकसान झालेलं नाही असं या पाकिस्तानी प्रवक्त्याचा दावा आहे.
सैन्याची 10 वाजता पत्रकार परिषद
पाकिस्तानाकडून करण्यात आलेले हल्ले आणि दाव्यांसंदर्भात भारतीय सैन्याकडून 10 वाजता प्रेस ब्रीफिंग होणार आहे. आधी पहाटे 5.45 वाजता पत्रकार परिषद होणार होती. पण आता 10 वाजता ही पत्रकार परिषद होईल असं सांगण्यात आलं आहे.
सलग तिसऱ्यादिवशी ड्रोन हल्ला
पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत. सलग तिसऱ्यादिवशी पाकिस्तानकडून भारताविरोधात ड्रोन हल्ले करण्यात आले. यात भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स पाडले. पंजाबच्या फिरोजपूरमध्ये खोई गावा जवळ एक ड्रोन पाडलं. एक जळतं ड्रोन घरावर पडलं. त्यात एका कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले.