RSS On CJP Protest : जंतर-मंतरवर आंदोलन का आणि कशामुळे झालं? RSS चं विश्लेषण
RSS On CJP Protest : मागच्या महिन्यात दिल्लीत जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन झालं. हे आंदोलन का आणि कशामुळे झालं? यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला तर्क मांडला आहे.

मागच्या महिन्यात दिल्लीत जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे या आंदोलनाचं सर्वात मोठं यश. सीजेपीच्या या आंदोलनाची सर्वच स्तरावर दखल घेण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं आहे. व्यवस्थेच्या अपयशामुळे जंतर-मंतरवर आंदोलन झालं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. विशाखापट्टणम येथे अखिल भारतीय समन्वय बैठक सुरु आहे. बैठकीत जंतर-मंतर आंदोलनावरही चर्चा झाल्याचं संघाकडून सांगण्यात आलं. आवश्यक पावलं उचलण्याचा संघाकडून सरकारला सल्ला देण्यात आला. समाजालाही आपल्या स्तरावर प्रयत्न करावे लागतील असं संघाचं म्हणणं आहे. “डिस्ट्रक्शनने काम होऊ शकत नाही. सकारात्मक दृष्टीने तोडगा काढावा लागेल” असं आरएसएस नेते मुकुंद सीआर जंतर-मंतर आंदोलनावर म्हणाले.
“युवकांच्या चिंता सरकारने सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. राष्ट्रीय संस्था आणि राज्य सरकारच्या संस्थांमध्ये असलेल्या कमतरतांमुळे युवकांमध्ये असंतोष आहे. त्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटते. त्यामुळे त्यावर तोडगा काढला पाहिजे. आंदोलनाच्या नावाखाली कुठलाही हिंसाचार करु नका” असं आवाहन मुकुंद यांनी केलं. सकारात्मक दृष्टीनेच एखाद्या समस्येवर तोडगा निघेल असं संघ नेत्याने सांगितलं. त्यासाठी सरकार आणि समाजाला एकत्र यावं लागेल. जागरुकता वाढवावी लागेल. सिस्टिममधल्या कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
काही समुदायांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे
बैठकीत लोकसंख्या संतुलन बदलाबद्दलही चर्चा झाल्याचं संघ नेत्याने सांगितलं. आज देशात युवकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण भविष्यात अशी स्थिती राहणार नाही. काही वर्षांनी स्थिती बदलायला सुरुवात होईल असं संघ नेत्याने सांगितलं. “भारत लोकसंख्या असंतुलनाचा सामना करत आहे. त्याशिवाय काही समुदायांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. काही समुदायांची कमी होत आहे” असं मुकुंद यांनी सांगितलं. देशातील युवकांवर नशेचा प्रभाव वाढतोय यावर सुद्धा बैठकीत चर्चा झाली. युवकांना सकारात्मकतेने कशा पद्धतीने योग्य मार्गाला आणता येईल. त्यांच्या भविष्याबद्दल सुद्धा चर्चा झाली पाहिजे असं मुकुंद म्हणाले.
सरसंघचालकांनी पंच परिवर्तनाचा विचार दिलाय त्यावर सुद्धा चर्चा झाली. त्याशिवाय कौटुंबिक मूल्य कशी कायम ठेवता येतील, यावर सुद्धा मंथन झालं. आरएसएसच्या कामाचा कसा विस्तार होईल यावर चर्चा झाली. आर्टिफिशियल इंटेलिजेंस सारखा विषय सुद्धा चर्चेला आला. त्याचा प्रभाव या सगळ्या विषयावर एक प्रेझेंटेशन झालं.
