शेजारी हे काय घडलं? रेतीचं महाभयानक वावटळ… भर दुपारीच काळाकुट्ट अंधार, 30 मिनिटं जीव खालीवर…
राजस्थानमध्ये दुपारी अचानक धूळ आणि रेतीचं महाभयानक वादळ आलं, ज्यामुळे 30 मिनिटांसाठी संपूर्ण परिसर काळाकुट्ट अंधारात बुडाला. 70 किमी/तास वेगाने आलेल्या या वादळामुळे लोक भयभीत झाले. त्यानंतर झालेल्या पावसामुळे 45 अंश सेल्सिअसवरून तापमान 8 अंशांनी घटले.

सध्या निसर्गाचं चक्र फिरलेलं आहे. उन्हाळ्यात पाऊस पडतोय, हिवाळ्यात पाऊस पडतोय आणि पावसाळा सुरू झाला तरी पाऊस पडत नाही, अशी हवामानाची विचित्र स्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. खासकरून बळीराजा वैतागला आहे. हवामानात कधी काय बदल होईल याचा काहीच नेम नसल्याचं दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी देशातील काही भागात चक्री वादळ येण्याचा इशारा देण्यात आला होता. तो खरा होताना दिसत आहे. राजस्थानच्या सीमावर्ती भागात दुपारी निसर्गाचं अद्भूत पण भीतीदायक रुप पहायाला मिळालं. चुरू येथे दुपारी 2 वाजता आणि श्रीगंगानगरमध्ये अचानक वातावरण बदललं. आकाशात धूळ आणि रेतीचं वावटळ उठलं. हे वावटळ एवढं भयानक होतं की त्याने संपूर्ण सूर्यच झाकला. त्यामुळे भर दुपारीच काळाकुट्ट अंधार झाला. जणू काही रात्रच झाली. त्यामुळे लोक चांगलेच घाबरून गेले होते.
धुळीचं वावटळ एवढं मोठं होतं की दुपारीच चारही दिशेला अंधार झाला. समोरचं काहीच दिसेनासं झालं. रस्त्यावरून चालणारी वाहन अचानक अंधार झाल्याने जागीच थांबल्या. वाहनचालकांना मार्ग काढण्यासाठी दुपारीच वाहनांची हेडलाइट्स लावावी लागली. जेणे करून समोरचं दिसलं पाहिजे आणि कोणताही अपघात होऊ नये.
Bikaner City – when Massive Dust Storm covering the City pic.twitter.com/leMn4hmLOj
— Weatherman Rajasthan (@Rajsthanweather) May 30, 2026
30 मिनिटाचं तांडव
दोन पाच मिनिटं नव्हे तर तब्बल 30 मिनिटे हे वावटळ आकाशात घोंघावत होतं. हे साधंसुधं वादळ नव्हतं. तर ताशी 70 किलोमीटरने वारे वाहत होते. यावरून हे वादळ किती भयानक होतं याचा अंदाज येतो. हवामान विभागानेही याला पुष्टी दिली आहे. आकाशात प्रचंड मोठे ढग दाटून यावेत असं हे पांढरं शुभ्र रेतीचं वादळ आलं होतं. संपूर्ण भाग पांढऱ्या रेतीच्या वादळाने झाकून गेला होता. तब्बल 30 मिनिटे हा खेळ सुरू होता. त्यामुळे लोक प्रचंड घाबरून गेले. सर्वांनी दरवाजे, खिडक्या बंद करून घेतल्या.
आणि पाऊस सुरू झाला…
सुरुवातीला प्रचंड वेगाने वारे वाहिले. त्यानंतर रेतीचं वादळ आकाशभर पसरलं. प्रचंड वेगाने हे वादळ वाहत होतं. त्यामुळे संपूर्ण परिसरात काळोख झाला होता. भयानक वादळाचं हे रुप पाहिल्यानंतर लोकांनी निसर्गाचं दुसरं रुपही पाहिलं. धूळ जमिनीवर बसताच पुन्हा आकाशात काळे ढग दिसून लागले. आणि काही भागात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिक सुखावले. वादळ आणि पावसाच्या या जुगलबंदीमुळे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला 45 डिग्रीचा पारा अचानक खाली आला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या मते, या वावटळ आणि पावसामुळे तापमानात 8 डिग्री अंश सेल्सिअसने घट झाली आहे.
