LPG Gas e-KYC : गॅस हवा असेल तर e-KYC गरजेची? नेमका दावा काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती!
गॅस सिलंडरच्या बुकिंगसाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे असा दावा केला जात होता. यामुळेच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

LPG Cylinder e-KYC : सध्या एलपीजी गॅस सिलिंडरचा देशभरात तुटवडा निर्माण झाला आहे. इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे भारतापुढे हा पेच निर्माण झाला आहे. गॅस बुकिंग करूनही लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाहीये. विशेष म्हणजे लोक गॅस वितरण केंद्रावर रिकामा सिलिंडर घेऊन घेऊन रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळावा यासाठी सरकारने अनेक नियमांत बदल केला आहे. या बदलामुळेही लोकांची अडचण झाली झाली आहे. आता एक गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर दुसरा गॅस सिलिंडर 25 दिवसांनीच बुक करता येतोय. यासह पीएनजीचे कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना एलपीजी गॅस सिलिंडर दिले जात नाहीये. असे असतानाच आता गॅस सिलिंडरच्या बुकिंगसंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. अलीकडेच ई-केवायसीबाबत एक दावा केला जात होता. या दाव्यावर आता केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
नेमका संभ्रम काय?
गॅस सिलिंडरसाठी प्रत्येकाने ई-केवायसी करणे गरजेचे आहे, असा दावा काही ठिकाणी केला जात होता. तसे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. या दाव्यामुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आता हाच संभ्रम दूर व्हावा यासाठी सरकारने ई-केवायसीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एलपीजी बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन म्हणजेच ई केवायसीची प्रक्रिया सर्वांसाठीच लागू नाही. ज्या लोकांनी ही ई-केवायसी केलेली नाही, त्यांनाच फक्त ही केवायसी करायची आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
Clarification: LPG Biometric Aadhaar Authentication (eKYC) only required for unauthenticated LPG customers and not all customers pic.twitter.com/oySbhPgJ47
— Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG (@PetroleumMin) March 17, 2026
सरकारने काय स्पष्टीकरण दिले?
सोबतच हा नियम आता लागू केलेला नाही. तो खूप दिवसांपासून लागू आहे, असेही पेट्रेलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याआधी ई केवायसी न केलेल्या ग्राहकांनाच ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सोबतच तुम्ही पीएमयूवाय योनजेचे लाभार्थी नसाल आणि केवायसी केलेली असेल तर तुम्हाला आता पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही, असेही सरकारने सांगितले आहे. तर पीएमयूवाय योजनेच्या लाभार्थ्यांनी प्रत्येक वर्षाला केवायसी करावी लागते. ही केवायसी सबसीडी मिळावी यासाठी गरजेची आहे. आठव्या आणि नवव्या गॅस बुकिंगवेळी सबसीडी मिळावी म्हणून या योजनेअंतर्गत सातव्या गॅस बुकिंगच्या वेळी केवायसी करावी लागते, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
