‘राज्यातील मातीत गोगलगायीचा विस्तार झाला, आधी टीका केली आता त्यांनाच मंत्रिपद’; मंत्रिमंडळ विस्तारावरुन जयंत पाटलांचा खोचक टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टीका केलीय. राठोड आणि सत्तार यांना आधी खाली खेचायचं आणि मग स्वत:च्या बाजूला बसवायचं हा विरोधाभास भाजपच करु शकतं, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) पार पडला. आज राजभवनातील दरबार हॉलमध्ये शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 अर्थात एकूण 18 आमदारांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. महत्वाची बाब म्हणजे कालपर्यंत शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संजय राठोड यांना मंत्रिपद मिळणार का? याबाबत साशंकता होती. मात्र, आज अखेर या दोघांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आलीय. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टीका केलीय. राठोड आणि सत्तार यांना आधी खाली खेचायचं आणि मग स्वत:च्या बाजूला बसवायचं हा विरोधाभास भाजपच करु शकतं, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
‘विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडूच’
जयंत पाटील म्हणाले की, अखेर 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. राज्यातील मातीत गोगलगायींचा विस्तार झालाय, शेतकरी हवालदील आहे. आता मंत्र्यांनी तातडीनं कामाला लागावं, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. त्याचबरोबर महिलांना स्थान न देणं हे बाहेरुन दिसू शकतं पण कुणाला स्थान द्यायचं, कुणाला द्यायचं नाही हे मुख्यमंत्री आणि सहकारी ठरवत असतात. या मंत्रिमंडळानं उत्तम काम करावं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडूच, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी दिलाय. तसंच बिहारमध्ये जे झालं ते अपेक्षितच होतं, शिवसेनेनंही राज्यात तेच केलं आहे, असंही पाटील यावेळी म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला. आज शिंदे गटाकडून 9 आणि भाजपकडून 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शिंदे गटाचे मंत्री
दीपक केसरकर गुलाबराव पाटील उदय सामंत अब्दुल सत्तार संदीपान भुमरे दादा भुसे शंभुराज देसाई तानाजी सावंत संजय राठोड
भाजपचे मंत्री
चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन मंगलप्रभात लोढा राधाकृष्ण विखे पाटील सुरेश खाडे विजय कुमार गावित अतुल सावे रवींद्र चव्हाण
अपक्षांना संधी नाही
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात अपक्षांना स्थान देण्यात आलेलं नाही. शिंदे गटाने एकाही अपक्ष आमदाराला मंत्रिपद दिलं नाही. पुढील विस्तारात या अपक्षांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.