Vastu Shastra : या दिवशी घरात कधीच लावू नये तुळशीचं झाड, वास्तुशास्त्र काय सांगतं?
ज्या घरात तुळस असते त्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहतो, वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात आर्थिक स्थैर्य लाभतं, त्यामुळे प्रत्येक घरात तुळस ही असलीच पाहिजे, असं वास्तुशास्त्र सांगतं. मात्र घरात तुळस कधी लावावी? याचे देखील काही नियम आहेत.

हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये तुळशीला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात तुळस असते त्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपोआप कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होतो. तुळशीमुळे घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष देखील नष्ट होतात. भगवान विष्णू आणि लक्ष्मी मता यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असते, ज्या घरात नियमित तुळशीची पूजा होते, अशा घरावर सदैव भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद राहतो, अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही. मात्र घरात तुळस लावण्याचे देखील काही नियम आहेत, या सर्व नियमांचं पालन करून जर तुम्ही घरात तुळस लावली तर तुम्हाला त्याचं शुभ फळ मिळतं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात, घरात तुळस लावण्याचे काय नियम आहेत? आणि काय काळजी घेतली पाहिजे?
या दिवशी घरात लावा तुळस
तुळस हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अत्यंत प्रिय झाडं आहे. ज्या घरात तुळस असते अशा घरावर सतत भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की घरात तुळस नेहमी गुरुवारी किंवा शुक्रवारी लावावी. कारण गुरुवार हा वार भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तर शुक्रवार हा वार लक्ष्मी मातेला समर्पित आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी घरात तुळस लावणे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच महिन्याबाबत बोलायचं झाल्यास तुम्ही जर कार्तिक महिन्यात घरी तुळस लावली तर ते अधिकच उत्तम.
या दिवशी चुकूनही घरात लावू नका तुळस
घरात तुळस कोणत्या दिवशी लावावी याचे जसे काही नियम आहेत, तसेच तुळस कोणत्या वारी घरात लावू नये? याचे देखील काही नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार बुधवारी, सोमवारी आणि शनिवारी घरी तुळस लावू नये. तुळस ही नेहमी गुरुवारी किंवा शुक्रवारीच लावावी, असं वास्तुशास्त्र सांगतं.
या गोष्टी देखील लक्षात ठेवा
वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात तुळस असेल तर काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. सकाळी अंघोळ झाल्यानंतर नित्यनियमाने तुळशीची पूजा करा, तुळशीला जल अर्पण करावं, फक्त रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच सायंकाळच्यावेळी नियमित तुळशीजवळ दिवा लावला गेला पाहिजे, असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
